जरांगे हवेवर नाचतात, तो हवेचा प्रेशर…, सदावर्ते यांचा जरांगे पाटलांना खोचक टोला
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी या आंदोलनाला उपस्थित राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. दरम्यान सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली, त्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
दुसऱ्या झोडो पत्रकार परिषदेमुळे जरांगे पाटलांना मिरची लागली, मनोज जरांगे पाटलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. ओबीसी, भटक्या जमाती, तेली समाजाचा ते असा अपमान करू शकत नाहीत. माज कोणाला आलाय, माज कोणाला चढला आहे, हे महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे. क्रेनवर उभा राहून, बोलतातना, त्यामुळे ते बघून लोक सांगतील कोणाला माज आला आहे ते? असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तसेच जरांगे पाटील ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते बोलणं, एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला पटतंय का? असा सवालही यावेळी सदावर्ते यांनी केला आहे. जरांगे हवेवर नाचतात, ती हवा, तो हवेचा प्रेशर उपमुख्यमंत्री यांनी बंद केला पाहिजे, त्यामुळे ते उड्या मारणार नाहीत, असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे, यावर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण गांभीर्याने घेतले पाहिजे, प्रशिक्षणासाठी जाणं हा विद्यार्थ्यांसाठी एक जुनून आणि अनुभवाचा भाग आहे. केंद्रीय मंत्रालयाने प्रकरण गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. देशातील प्रत्येक तालुक्यात विमानतळ असावा अशी अपेक्षा आहे. मात्र विमानतळाच्या जागेची तांत्रिकदृष्ट्या योग्य निवड महत्त्वाची आहे. विमान उतरणे आणि उड्डाणासाठी जागा सुरक्षित आणि योग्य आहे का? याचा तांत्रिक अभ्यास आवश्यक, आहे असंही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.