लाज वाटली पाहिजे, माफी मागा…, फडणवीस हर्षवर्धन सपकाळांवर संतापले, टिपू सुलतानवरून वातावरण तापलं

टिपू सुलतानवरून सध्या राज्यात पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

लाज वाटली पाहिजे, माफी मागा..., फडणवीस हर्षवर्धन सपकाळांवर संतापले, टिपू सुलतानवरून वातावरण तापलं
devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 6:52 PM

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.  या वादावर  प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं असून, भाजपकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, टिपू सुलतान सारख्या व्यक्तीची तुलना ते छत्रपती शिवरायांसोबत करत आहेत, हे अत्यंत निंदनीय काम आहे. छत्रपतींनी स्वराज्य उभारलं, मोगलांच्या जोखडांतून  सामान्य माणसाला मुक्त केलं. खऱ्या अर्थाने त्यांनी सामान्य रयतेचे राज्य स्थापन केलं. तर दुसरीकडे टिपू सुलतानने हजारो लाखो हिंदूंची हत्या केली. मात्र हर्षवर्धन सपकाळ दोघांची तुलना करून दोघांना सारखा सन्मान द्या, असे म्हणतात. यापेक्षा जास्त लांगुनचालन  या जन्मात मी पाहिलेलं नाही, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की,  आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतानची तुलना केल्याबद्दल सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे,  काँग्रेस पक्षात थोडी जरी नैतिकता राहिली असेल, तर काँग्रेसने सुद्धा त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे. आणि आपली भूमिका देखील स्पष्ट केली पाहिजे.  हर्षवर्धन सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले, याचं संशोधन केलं पाहिजे? हा जो नवा इतिहास ते लिहीत आहेत, तो इतिहास महाराष्ट्र आणि भारत कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिला आहे. दरम्यान यावरू आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.