उकाडा जीवावर उठला… महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी; लोकांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या
Heat Wave Alert : राज्याच्या प्रत्येक विभागात सूर्य आग ओकत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे, अशातच आता अकोल्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्याच्या प्रत्येक विभागात सूर्य आग ओकत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून उष्णतेचा कहर पहायला मिळत असून अकोल्याचे तापमान 44 अंश सेल्सिअस वर गेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराचं बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे, कारण अजून तीन ते चार दिवस अशी उष्णतेची लाट जाणवणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अशातच अकोल्यामध्ये उष्मघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उष्माघाताचा पहिला बळी
अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीत. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यू मागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोल्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला असल्याची बातमी आली आहे.
अमरावतीत पारा वाढला
पश्चिम विदर्भातही उष्णतेची लाट आली आहे, अमरावतीचा पारा 43 अंशाच्या वर गेला आहे. उन्हामुळे दुपारी रस्त्यावरील गर्दी ओसरली आहे. पुढील काही दिवस तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिक घराबाहेर पडताना काळजी घेत आहेत. तसेच उन्हामुळे मुख्य रस्ते आणि बाजारपेठेतील गर्दी ओसरली आहे.
मालेगावात वाढत्या तापमानाचा बाल रुग्णालयांवर परिणाम…
मालेगाव शहर व तालुक्यातील तापमानाचा पारा 42 अंशाच्या जवळपास गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेचा परिणाम आता लहान बालकांवरही दिसून येत आहे. शहरातील बाल रुग्णालयांमध्ये डायरिया आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. सध्या लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात सुरू असून अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या जारमधील दूषित पाणी तसेच तीव्र उष्णतेमुळे लहान मुलांमध्ये अतिसार व तापाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. दरम्यान, पालकांनी मुलांना स्वच्छ पाणी पाजावे, उन्हात जाणे टाळावे आणि कोणतीही लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील तापमान 41 अंश सेल्सिअसवर
बीड जिल्ह्यातील तापमानात कालपासून वाढ होऊ लागली आहे. आज दुपारी तापमान तब्बल 41 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून या वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे बाजारपेठेत आणि रस्त्यावर लोकांची गर्दी कमी दिसत आहे. तापमान वाढल्याने आरोग्य विभागाने आवश्यकता असेल तर बाहेर पडा, आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन केले आहे.
जळगावात तापमानाचा पारा 42.5 अंशांवर
जळगाव मध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा 42.5 अंशांवर पोहोचला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचे चटके तसेच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरातील रस्त्यावरील डांबर देखील वितळत असून प्रसरण पावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत.
ठाण्यातही तापमान वाढले
हवामान खात्याने आज आणि उद्या देखील ठाणे जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला असून उद्या देखील 40° तापमान जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक विद्यार्थी आणि ठाणेकर थंड शीतपेय पिताना दिसत आहेत. उष्णतेचा फटका रस्त्याने चालत जाणाऱ्या आणि वाहन चालकांना देखील बसताना दिसत आहे ..त्यामुळे डोक्यावरती टोपी ,तोंडावर स्कार्फ महिला लावून ठाणेकर प्रवास करताना दिसत आहे.
यवतमाळकर उष्णतेने हैराण
ढगाळी वातावरणानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यवतमाळकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सूर्य आग ओकू लागला असून शहराचा पारा 43.2 अंश सेल्सिअस पोहोचला आहे. आणखी एप्रिल मे महिना बाकी आहे, या दोन महिन्यामध्ये पारा 44 ते 45 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर टोपी किंवा शेला घ्यावा तसेच थंड पेय प्यावे जेणेकरून उन्हापासून आपले संरक्षण होईल असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.