29,30,31 तारखेला पावसाचा कहर, उद्या या जिल्ह्यातील शाळा बंद; मुख्यमंत्री कार्यालयाकडून अलर्ट जारी

Heavy Rain Alert : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

29,30,31 तारखेला पावसाचा कहर, उद्या या जिल्ह्यातील शाळा बंद; मुख्यमंत्री कार्यालयाकडून अलर्ट जारी
Maharashtra Heavy Rain Alert
Image Credit source: Google
| Updated on: Jul 28, 2026 | 7:51 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. खासकरून नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यात उद्याही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, अंगणवाडीला उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुटीची घोषणा केली आहे. आज दुपारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी शिरले होते, काही शाळांमध्येही पाणी शिरल्याने काही विद्यार्थी अडकले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उद्या नागपूर शहर आणि ग्रामीण मधील हिंगणा, कामठी, शहरा लगतच्या भागातील शाळा, महाविद्यालय, अंगणवाडींना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

29 ते 31 जुलैदरम्यान मुसळधार पाऊस कोसळणार, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत म्हटले की, ‘बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे.

काही भागात दरड कोसळण्याची शक्यता

या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार, 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. 30 जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो. 31 जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांचा परिसर तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us