बाबा है तो सबकुछ है… योगी आदित्यनाथांची चर्चा, 2029 ला पंतप्रधानपदी, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा
भाजपसोबत युती करून सत्तेत बसलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या एका दाव्यावरून राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 2029 मध्ये देशाचे पंतप्रधान योगी आदित्यनाथच होतील, असं ते म्हणालेत .
रमेश चेंडके, हिंगोली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात भाजप पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जिंकण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत अन्य कोणताही चेहरा नाही, असं म्हटलं जात असतानाच एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर विराजमान होतील तर 2029 मध्ये हिंदुस्थानचे पंतप्रधान योगी आदित्यनाथ होतील, असा दावा आमदार संतोष बांगर यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चर्चेत आलेले हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे नुकतेच शिंदेंसोबत अयोध्या दौऱ्यावरून परत आले. हिंगोलीत आगमन झाल्यानंतर त्यांनी टीव्ही9शी बातचित केली. अयोध्येत शिवसेना आणि भाजप नेत्यांचं झालेलं भव्य स्वागत पाहून भारावून गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच उत्तर प्रदेशातला हिंदुत्वाचा प्रसार पाहून योगी आदित्यनाथ हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे पंतप्रधान असतील, असा दावा बांगर यांनी केलाय. शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या या दाव्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
मुग्यांसारखी लोकं आली होती…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार, खासदार यांचा अयोध्या दौरा हिंदुत्वमयी वातावरणाने भारलेला होता, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली. संतोष बांगर म्हणाले, ‘ नतमस्तक झालो. साकडं घातलं भारतदेशावर ज्या पद्धतीने हिंदु राज्य आहे. ते कायम अबाध राहो. हीच रामाच्या चरणी प्रार्थना केली आहे. ज्या वेळी अयोध्येला गेलो, तेव्हा हिंदु काय असतो, हे अयोध्येच्या जनतेने दाखवलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा जयघोष झाला.. जो भव्य सत्कार झाला, ते पाहून हृदय भरून आलं. अनेक मुंग्यासारखी लोकं सत्कारासाठी रस्त्यावर उतरली होती. बॅनरबाजी , आतिषबाजी, फुलवर्षाव झाला…असं वर्णन संतोष बांगर यांनी केलंय.
बाबा है तो सबकुछ है..
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा असल्याचं संतोष बांगर यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘अयोध्येचं नाव आधी गाझियाबाद होतं. मात्र आता अयोध्येचं रुपच पालटलं आहे. आम्ही गेलो तेव्हा योगी आदित्यनाथ तेथे आले होते… बाबा है तो सबकुछ है… हेच वाक्य तिथल्या लोकांच्या तोंडी होतं. २०२९ ला योगी आदित्यनाथ हे या हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी बसल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलंय.
काही आमदार नाराज?
अयोध्येच्या दौऱ्यावर एकनाथ शिंदे गटातील काही आमदार गैरहजर होते. ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. विरोधकांनी यावरून अनेक दावेही केले आहेत. यावरून संतोष बांगर म्हणाले, ‘ विरोधकांना दुसरा धंदा राहिलेला नाही. माझंही कँसल होणार होतं. मतदारसंघात कार्यक्रम असतात. ते कार्यक्रम सोडता येत नाहीत…