शिर्डी – देश-परदेशातील गुप्त माहिती फोडण्यासाठी, उद्योगपतींची कामे करुन घेण्यासाठी, कोट्यवधींच्या प्रकरणात हनी ट्रॅपचा वापर झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण संगमनेर (Sangamner )तालुक्यात साकुर गावात एका माकडाला (for monkey) पकडण्यासाठी हनी ट्रॅपचा (honey trap)वापर करण्यात आल्याचं ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या साकूर गावात एका माकडानं चांगलाच धुमाकूळ घातला होता. गावातील लहान मुलं त्याच्या टार्गेटवर होती. घरात कुणी नसताना किंवा रस्त्यावरुन चालताना हे माकडं समोर येत असे आणि मुलांवर हल्ला करत असे. गावातली काही मंडळी त्याला खायला देत असत, त्यांच्याही अंगावर हे विचकून जात असे. आत्तापर्यंत 20ते 25 मुलांना चावा घेऊन या माकडानं गावाला बेजार करुन सोडलं होतं. जखमी झालेल्यांना उपचारासाठी अहमदनगरच्या दवाखान्यात नेण्याची वेळ येत होती. स्थानिक ठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा मुख्यालय गाठण्याची वेळ स्थानिकांवर येत होती.
या माकडाने असा उच्छाद मांडलेला असल्याने गावकरी चांगलेच धास्तावले होते. एका अकरावीत असलेल्या मुलीच्या घरात शिरुन त्याने मुलीच्या हाताचा चावा घेतला होता. हा सगळा प्रकार थांबवायला हवा, असं स्थानिकांनी ठरवलं आणि त्यांनी थेट वन विभागाकडे या माकडचाळ्यांची तक्रार केली. वनविभागानेही ततडीने उपाययोजना करत या गावात रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं होतं.
स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर, गेल्या काही दिवसांपासून साकूर गावात वनखात्याच्या रेस्क्यू टीम तळ ठोकून होती. त्या माकडाला पकडण्यासाठी गावात चार पिंजरे लावण्यात आले होते. पण हे माकड सगळ्यांना चकवा देत होतं. त्याचे हल्लेही थांबत नव्हते. अशा स्थितीत करायचं काय, असा प्रश्न वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही पडला होता.
माकड अजूनही पिंजऱ्यात येत नसल्यामुळं अखेरीस अधिकाऱ्यांनी हनी ट्रॅप वापरायचं ठरवलं. हनी ट्रॅपसाठी
एका माकडीणीला या परिसरात आणण्यात आले. या परिसरात माकडीणी असल्यामुळेच हे माकड या परिसरात आली असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वाटत होती. अखेरीस या परिसरात माकडीण आणल्यानंतर या माकडाला जेरबंद करण्यात अखेर यश आलं. माकडीणीला भेटण्यासाठी आलेल्या माकडाला लांबून इंजेक्शन फेकून मारण्यात आले. त्यानंतर माकड बेशुद्ध पडल्यानंतर त्याला अखेरीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय.
गेल्या आठ दिवसापासून दहशत माजविणा-या माकडाला अनोखी शक्कल वापरून वनविभागाने जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतलाय. अनेकांना आता एकट्याने घरात राहणे शक्य होणार असल्याचे सांगितले. लहान मुलांना सर्वाधिक आनंद झाला आहे. मात्र आता गावासमोर दुसरी चिंता उभी राहिली आहे. आता या परिसरात काही वानरे दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गावकरी पुन्हा नव्या चिंतेने धास्तावलेले आहेत.