भीषण अपघाताने संभाजीनगर हादरलं, एकाच कुटुंबातील चौघांचा अंत; मृतांमध्ये चिमुकलीचाही समावेश

Paithan Accident : पैठण तालुक्यातील विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर भीषण अपघात झाला असून एका दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भीषण अपघाताने संभाजीनगर हादरलं, एकाच कुटुंबातील चौघांचा अंत; मृतांमध्ये चिमुकलीचाही समावेश
Paithan Accident News
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 21, 2026 | 9:59 PM

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. पैठण तालुक्यातील विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर भीषण अपघात झाला असून एका दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड येथून आठवडी बाजार करून खंडाळा येथील पारधी वस्तीकडे परतणारे चव्हाण कुटुंब दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार चव्हाण कुटुंबातील सदस्य घराकडे जात होते, यावेळी समोरून आलेल्या पिकअपची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन महिला, एक पुरुष एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मृतांची नावे

या अपघातातील मृतांची नावे आता समोर आली आहे. या अपघातात सिद्धार्थ चव्हाण (वय 30 वर्ष), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय 27), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय 5) व संजना अभिषेक चव्हाण (वय 22 वर्ष) या चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे संपूर्ण खंडाळा परिसरावर शोककळा पसरली आहे.

पुणे – पिरंगुट घाटात 20 फूट खोल दरीत वाहन कोसळले

पुण्याच्या मुळशीतील पिरंगुट घाटात 20 फूट खोल दरीत चारचाकी वाहन कोसळल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने हे वाहन एका झाडाला अडकल्याने मोठे नुकसान टळले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र चालक किरकोळ जखमी झाला आहे. घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आला आहे.

घाट रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने हे वाहन थेट खाली गेले आहे. या अपघातानंतर घाटातील संरक्षक कठड्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. घाटातील रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने वारंवार या घाटात अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळं नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर लवकरात लवकर या घाट रस्त्याला संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Follow Us