आघाडी किती दिवस टिकणार, उद्धव ठाकरेंनी रोखठोक सांगितलं…

| Updated on: Jun 19, 2021 | 7:37 PM

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडी किती दिवस टिकणार असा सवाल करणाऱ्यांना रोखठोक उत्तर दिलं.

आघाडी किती दिवस टिकणार, उद्धव ठाकरेंनी रोखठोक सांगितलं...
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी स्वबळाची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांना चिमटे काढतानाच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी किती दिवस टिकणार यावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा (तिन्ही पक्षांचा) हेतू प्रामाणिक आहे. राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची सेवा करुन त्यांचा आशीर्वाद मिळवणे यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन विकासाच्या दिशेने पावलं टाकत आहेत. (How long Mahavikas Aaghadi will survive, Uddhav Thackeray answers)

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना मराठी माणसाच्या हक्काबद्दल बोलत होती तेव्हा काहीजण आम्हाला संकुचित म्हणायचे. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिल्यानंतर यातलेच काहीजण आम्हाला धर्मांध म्हणू लागले. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावर आमच्या हिंदुत्वावर, विचारांवर संशय घेतला जातो. मला आज यानिमित्ताने सांगायचं आहे की, आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का असं विचारलं जातं. मला या लोकांना सांगायचं आहे की, हिंदुत्व हे काही नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे. त्यामुळे गैरसमज करु नका.

ठाकरे म्हणाले की, शिवसेने भाजपसोबत युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. ही आघाडी किती टिकणार वगैरे प्रश्न विचारले जातायत. विरोधकांकडून ही आघाडी टिकणार नसल्याची वक्तव्ये केली जात आहेत. परंतु या सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की, आघाडी टिकण्याची काळजी तुम्ही करु नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची सेवा करुन त्यांचा आशीर्वाद मिळवणे यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत.

शिवसेनेचा आज 55 वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच शिवसेनेची पुढील वाटचाल आणि भाजपबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय. मी 55 वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझं अभिवादन. माझ्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, अशा शुभेच्छा देतानाच गेल्या दीड वर्षात आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात दुखतंय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतंय, ते त्यांचं त्यांनी पाहावं, त्यांना औषध मी नाही देणार. राजकीय औषध मी देईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तीन सण महत्त्वाचे

प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सण आहेत, 23 जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, दुसरा म्हणजे 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो आणि केलेच पाहिजे, असंही ते म्हणाले.

स्वबळाचा नारा आपणही देऊ

अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक आहे, असं ते म्हणाले. (CM Uddhav Thackeray address shivsainik on shiv sena foundation day)

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Live: शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसैनिकांशी संवाद साधणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोना नियमावली पायदळी तुडवली

काँग्रेसच्या ‘स्वबळा’ला सुशीलकुमार शिंदे यांचंही बळ; म्हणाले…

(How long Mahavikas Aaghadi will survive, Uddhav Thackeray answers)