धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार की नाही हे सांगायला मी काय खरात आहे का?; भुजबळांचा चिमटा

Munde and Bhujbal : धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार की नाही हे सांगायला मी काय खरात आहे का?; भुजबळांचा चिमटा
Bhujbal and Munde
Image Credit source: Google
| Updated on: Mar 28, 2026 | 5:18 PM

धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंडे यांना बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि इतर आरोपींवर देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ते पुन्हा मंत्रिमंडळात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मी खरात नाही – भुजबळ

छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं हा निर्णय मुख्यमंत्री यांचा आहे. मंत्रिमंडळ पूर्ण नसलं तरीही सरकार चालतं. आमच्या पक्षातून कोण मंत्री असेल हे सुनेत्रा पवार ठरवतील. एक दोन मंत्री नसतील तरी सरकार चालतं. धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येणार की नाही हे सांगायला मी काही खरात नाही.’

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर बोलताना भुजबळ यांनी म्हटले की, ‘हे दुर्दैव आहे, नाशिकमध्ये या गोष्टी घडतात मला याच अत्यंत दुःख वाटत आहे. अजून आपले लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या गोष्टी कधी ना कधी बाहेर येतातच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातलं आहे.’

खरातचं नाव मी ऐकलं होतं पण…

40 आमदार तीर्थ प्यायचे यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘तिथे ईशानेश्र्वर मंदिर आहे, वाईट कामात त्यांचा सहभाग आहे अस म्हणता येणार नाही. चाकणकर यांचं नाव आलं, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. ज्या माणसाला स्वतःच भविष्य कळलं नाही तो काय दुसर्‍याच भविष्य पाहणार? सगळेच नेते सारखे नसतात. एखाद-दुसरी चूक माफ केली जाते.’ तुम्ही कधी खरात कडे गेले होते का? यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘खरातच नाव मी ऐकलं होत पण मी कधी त्याच्याकडे गेलो नाही.’

Follow Us