ना आईच्या अस्थींचं विसर्जन, ना दहावं, ना तेरावं, ना गोड जेवण… IAS तुकाराम मुंढे यांचा कर्मकांडाला फाटा
IAS Tukaram Mundhe : राज्यातील धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे हे नेहमीच चर्चेत असतात. अलिकडे त्यांच्या आईचे निधन झाले, या निधनानंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यभरात नेहमी चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांचे निधन झाले. यानंतर तुकाराम मुंढे यांनी आईचे विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांच्या निधनानंतर परंपरेप्रमाणे नदीमध्ये अस्थी विसर्जन न करता तुकाराम मुंढे व अशोक मुंढे यांनी दारामध्ये एक वडाचे झाड लावत तिखे अस्थी विसर्जित केल्या.

तुकाराम मुंढे यांनी आता दहावा, तेरावा व गोड जेवण असे कोणतेही विधी होणार नाहीत असे जाहीर करत कर्मकांडाला फाटा दिला आहे. त्यामुळे आता मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा होत आहे.

तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, 'मला माझ्या आईचा पाठिंबा नेहमीच मिळत आला. तिचं नेहमीच म्हणणं असायचं की, जी जबाबदारी किंवा भूमिका दिली जाईल, ती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित पार पाडावी. पूर्वी आम्ही बदल्यांच्या विषयावर चर्चा करायचो, पण आता त्यावर बोलणं थांबवलं होतं, कारण तो पूर्णपणे शासनाचा अधिकार आहे.

'निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे.' या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता, त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या आहेत, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.