IMD Rain Forecast : ही तारीख आजच नोट करा, महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय मोठं संकट, आयएमडीच्या नव्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ
पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 28 जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह 15 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, या काळात ताशी 75 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब,झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, राज्याला पावसाने झोडपून काढलं आहे. पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान यंदा संपूर्ण जून महिन्यात पावसात मोठं खंड पडल्याचं दिसून आलं, जून महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरण्या रखडल्या हेत्या, परंतु त्यानंतर 1 जुलै पासून ते 9 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसात खंड पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु पुन्हा एकदा वीस जुलैपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, पिकांना जीवदान मिळालं. त्यानंतर आता 28 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.