विदर्भात पुन्हा अवकाळी अन् गारपीटचे संकट, राज्यातील तापमानाबाबत IMD चा काय अंदाज?

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणावर त्याचे परिणाम झाले आहे.

विदर्भात पुन्हा अवकाळी अन् गारपीटचे संकट, राज्यातील तापमानाबाबत IMD चा काय अंदाज?
राज्यात पुढील 48 तासांत सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीट होणार आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवसांत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. याशिवाय कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 04, 2025 | 8:09 AM

Weather update : राज्यात वातावरणात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाले आहे. एकीकडे राज्यांमधील काही शहरांचे तापमान 45 अंश सेल्सियसवर पोहचले आहे. दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीटचे संकट आहे. विदर्भातील काही भागांत शनिवारी अवकाळी पाऊस अन् गारपीट झाली. आता पुन्हा विदर्भासह, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मे महिन्यात तापमान वाढत असताना अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी काही ठिकाणी गारपीट देखील झाली. भारतीय हवामान खात्याकडून आताही विदर्भात पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणावर त्याचे परिणाम झाले आहे.

महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. अकोल्यात 44.9, चंद्रपूर 43.4, वाशिम 43, यवतमाळ शहराचे तापमान 43.4 अंश सेल्सियसवर गेले. मुंबईतील कुलाबात 34.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आले. पुणे शहराचे तापमान 40.3 अंशावर गेले. तापमान वाढीमुळे दुपारी संचारबंदी सदृश्य परिस्थिती शहरांमध्ये दिसत आहे. तापमान वाढीतून अजून दिलासा मिळणार नाही.  हवामान विभागाने 6 मे पर्यंत कोकण आणि गोवा विभागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 4 मे नंतर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चंद्रपूर, वर्धात पावसाने झोडपले

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याससह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. प्रामुख्याने नागभीड आणि मूल तालुक्यात वादळ, पाऊस आणि गारपीट झाली. नागभीड येथे वादळाने शहरभर धूळ उडवली आणि त्यानंतर पावसाने झोडपून काढले. या तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या. भाताचे उन्हाळी पीक कापणीवर आले असताना हा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यात वाढ झाली आहे.