जीवंतपणीच्या यातना मरणानंतरही संपल्या नाहीत, साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक

जळगावात माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. एका इसमाचा मृतदेहाला अंतिम संस्काराला नेताना नगरपरिषदेचा कोतेपणा समोर आला आहे.

जीवंतपणीच्या यातना मरणानंतरही संपल्या नाहीत, साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक
JALGAON NEWS
| Updated on: Jun 26, 2026 | 11:36 PM

जगताना काही जणांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते. अनेक जणांना जगताना डोक्यावर छप्पर देखील नसते. मात्र, जीवंतपणी यातना भोगाव्या लागलेल्या जीवाला मृत्यूनंतरही जर हालअपेष्टांना जावे लागत असेल तर त्या दुर्दैवाला काय म्हणावे असा प्रश्न जळगावातील एका घटनेने पडला आहे. जळगावातील ही घटना केवळ माणूसकीला काळीमा फासणारी नसून आपल्यातील कणव मेल्याची साक्ष आहे. “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” हा संदेश देणाऱ्या सानेगुरुजीच्या भूमीत अमळनेर येथे एका बेवारसाला अंतिम मुक्ती देतानाही नगरपरिषदेचा कद्रुपणा समोर आला आहे.

जळगावच्या अमळनेर येथे चक्क नगरपरिषदेच्या कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह स्मशानभूमीत नेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर चक्क कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अमळनेरमध्ये बेवारस स्थितीत आढळलेल्या एका इसमाच्या मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर तो थेट कचऱ्याच्या गाडीत ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. अमळनेर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून या गंभीर प्रकाराची चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अथवा ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई करण्याची प्रतिक्रिया फोनवरून दिली आहे.

मृत्यूनंतरही माणसाच्या अशी अवहेलना होत असेल तर ही केवळ प्रशासकीय अथवा ठेकेदाराची चूक नसून मानवतेलाच काळिमा फासणारी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे असे अमळनेरचे माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Follow Us