6 कांदा व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी आयकरचे छापे; पिंपळगाव बसवंत येथील कारवाईने खळबळ, कांद्याचे भाव 2500 रुपयांच्या खाली

| Updated on: Oct 21, 2021 | 5:19 PM

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

6 कांदा व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी आयकरचे छापे; पिंपळगाव बसवंत येथील कारवाईने खळबळ, कांद्याचे भाव 2500 रुपयांच्या खाली
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज गुरुवारी कांद्याच्या बाजार भावात प्रती क्विंटलमागे 1 हजार रुपयांची घसरण झाली. कांद्याचे बाजार भाव पंचवीसशे रुपयांपर्यंत खाली आल्यानंतर ही या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे शेतात लागवड केलेल्या कांद्याची रोपे खराब झाली आहेत. बदलत्या हवामानाचा फटका हा चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला ही बसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यात वाढ होत कांद्याचे बाजार भाव लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांच्यावर गेले. त्यामुळे किरकोळ बाजारात दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावाचा भडका उडाला. ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथील सहा कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांचे गोदाम, ऑफिस आणि घरी अशा 13 ठिकाणी छापे टाकले. त्याचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये आज दिसून आला. त्यामुळे बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी कांद्याच्या सर्वसाधारण दरात दोनशे रुपयाची घसरण होत कांद्याचे बाजार भाव 2500 रुपयांच्या खाली गेले. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

छापेमारी चर्चेचा विषय

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच काय महाराष्ट्र भर पावसाचे थैमान सुरू होते. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. खरीप पिकांना मोठा फटका बसला. कांद्याच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चाळीत ठेवलेला कांदा अनेक ठिकाणी खराब झाला. यामुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यात वाढ झाली. लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये तर कांद्याचे भाव चार हजार रुपयांच्यावर गेले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा बाजारात महागाईचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर झालेली छापेमारी चर्चेचा विषय ठरली आहे.

इतर बातम्याः

बहुचर्चित कांदे-निकाळजे वादाची चौकशी पूर्ण; पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष

बाळाला जबड्यात धरून नेणाऱ्या बिबट्यावर आईची चित्त्यासारखी झडप; नाशिकमध्ये हिरकणीचा थरार!

साहित्य संमेलनाची मैफल नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार; तारखांचा मेळ जुळता जुळेना!