बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सरकारकडून पक्षांची हत्या, मात्र नुकसान भरपाई 2009 च्या तोकड्या दराने

| Updated on: Feb 10, 2021 | 7:54 PM

महाराष्ट्रात 2006 नंतर आता पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. राज्यातील पोल्ट्री हब असलेल्या नवापूरमधील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आलाय.

बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सरकारकडून पक्षांची हत्या, मात्र नुकसान भरपाई 2009 च्या तोकड्या दराने
Follow us on

नंदुरबार : महाराष्ट्रात 2006 नंतर आता पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. राज्यातील पोल्ट्री हब असलेल्या नवापूरमधील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आलाय. बर्ड फ्लूमुळे होणारं नुकसान मोठं आहे. मात्र, शासनाच्यावतीने देण्यात येणारी मदत कमी असल्याने नवीन व्यवसाय कसा सुरु करावा असा प्रश्न पोल्ट्री उद्योजकांना पडलाय (Insufficient economical help to Poultry Farmers after killing Birds in Maharashtra).

2006 च्या बर्ड फ्लूनंतर मोठ्या हिमतीने उभ्या राहिलेला पोल्ट्री व्यवसाय आता आलेल्या बर्ड फ्लूमुळे संकटात आलाय. कोंबडीचे एक पिल्लू 25 रुपयांना मिळते. त्याला अंडे देईपर्यंत मोठं करण्यास 400 रुपये खर्च होतो. त्याच सोबत खाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यातच बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांसोबत खाद्य आणि अंडे नष्ट केले जात आहे. यानंतर सरकारकडून मिळणारी मदतही कमी आहे, अशी तक्रार या पोल्ट्री चालकांनी केलीय. तसेच अशा परिस्थितीत नवीन व्यवसाय कसा उभा करावा असा प्रश्न उपस्थित केलाय.

बर्ड फ्लूमुळे कोंबड्या आणि अंडी नष्ट केले जात आहे. त्याचप्रमाणे खाद्यही नष्ट केलं जातंय. पोल्ट्री व्यावसायिकांच्या गोडाऊनमध्ये हजारो टन खाद्य आहे. ते नष्ट न करता त्याला 3 महिने सील करावं, अशी मागणी व्यवसायिकांनी केलीय. त्यामुळे होणारं मोठं नुकसान वाचेल अशी आशा या पोल्ट्री व्यावसायिकांना आहे. बर्ड फ्लूमुळे होणाऱ्या पक्षांच्या हत्येनंतर सरकार नुकसान भरपाई देत आहे. पण ती नुकसान भरपाई अत्यंत तोकडी असल्याची तक्रार होतेय.

कोंबड्या, अंडी आणि खाद्याची भरपाई म्हणून प्रति पक्षी 90 रुपये, खाद्य 12 रुपये प्रतिकिलो, अंडे 3 रुपये या दराने नुकसान भरपाई होते. ही भरपाई 2009 च्या शासन निर्णयानुसार देण्यात येतेय, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. त्यामुळे राज्य शासनाने पोल्ट्री व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी मदत करताना हात आखडता घेतला तर पोल्ट्री व्यवसाय पुन्हा उभा राहणार नाही, असंही मत व्यक्त केलं जातंय. तसेच सरकारने मदतीचे निकर्ष बदलावेत, अशी मागणी होतेय.

हेही वाचा :

Bird Flu | राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक, नंदुरबारमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची किलिंग

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे कोणत्या पक्षाचे किती मृत्यू, राज्याची नेमकी स्थिती काय? वाचा सविस्तर…

नंदूरबारमध्ये ‘ऑपरेशन किलिंग’; दिवसभरात 88 हजार कोंबड्या मारल्या

व्हिडीओ पाहा :

Insufficient economical help to Poultry Farmers after killing Birds in Maharashtra