माणुसकी ओशाळली, लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू, आजोबा नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर रुग्णालयाबाहेर, नेमकं काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये लसीकरणानंतर अडीच महिन्यांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव शासकीय रुग्णालयाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे जवानाच्या पित्याच्या वडिलांना रात्रभर नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन बसावे लागले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

माणुसकी ओशाळली, लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू, आजोबा नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर रुग्णालयाबाहेर, नेमकं काय घडलं?
jalgaon 1
| Updated on: May 14, 2026 | 12:00 PM

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नियमित लसीकरणानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. मात्र, या दुःखात सांत्वन मिळण्याऐवजी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्दयी कारभार पाहायला मिळाला. यावेळी मृत बालिकेच्या आजोबांना रात्रभर नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन गृहाच्या बाहेर बसावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय घडलं?

टहाकळी प्रचा येथील जिल्हा परिषद शाळेत नियमित लसीकरण सत्र सुरू होते. सचिता दीपक बोरसे हिला पोलिओचा डोस आणि इतर आवश्यक लस देण्यात आल्या. लस टोचल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत बालिकेची हालचाल मंदावली. ती निपचित पडली. तिला तातडीने चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. सचिताचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात अयोध्या येथे कार्यरत आहेत.

या घटनेनंतर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आला. रात्री दोन वाजेच्या सुमारास आजोबा तुळशीदास मराठे मृतदेह घेऊन पोहोचले. मात्र, तांत्रिक कागदपत्रांचे कारण पुढे करत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. शवविच्छेदन सकाळी करा, पण मृतदेह किमान पेटीत तरी ठेवा, अशी विनंती आजोबांनी केली, मात्र ती धुडकावून लावण्यात आली. परिणामी, एका आजोबांना आपल्या लाडक्या नातीचा मृतदेह रात्रभर उघड्यावर मांडीवर घेऊन बसावे लागले.

आरोग्य विभागाचा दावा काय?

या घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, “हा बालिकेचा लसीकरणाचा दुसरा डोस होता. यापूर्वीच्या डोसमध्ये तिला कोणताही त्रास झाला नव्हता. त्यामुळे थेट लसीकरणामुळेच मृत्यू झाला असे म्हणणे घाईचे ठरेल. आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली असून, व्हिसेरा रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल.”

लसीकरण सुरक्षित आहे की नाही, हा तांत्रिक प्रश्न बाजूला ठेवला तरी, एका मृत बालकाच्या देहाची विटंबना करणाऱ्या रुग्णालय प्रशासनावर कारवाई होणार का? हा प्रश्न आता विचारला जात आहे. सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या सैनिकाच्या मुलीच्या वाट्याला जर ही परवड येत असेल, तर सामान्य जनतेचे काय? असा संतप्त सवाल जळगावकर विचारत आहेत.

Follow Us