नाशिकमध्ये जमलं पण जळगावात फिस्कटलं, थेट एकनाथ शिंदेंनाच चॅलेंज, महायुतीचं टेन्शन वाढलं
जळगाव विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून, भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा सरिता माळी यांनी केला आहे

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत बंडखोरीचा पेच अधिकच वाढला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे जळगावातील महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी माघार घेत महायुतीला पाठिंबा दिला असला, तरी जळगावात मात्र रेश्मा काळे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतरच निर्णय
नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेतल्यानंतर जळगावातून रेश्मा काळे देखील माघार घेतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, या चर्चा रेश्मा काळे यांनी फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रेश्मा काळे म्हणाल्या, “खूप दिवसांपासून पाठिंबा आणि माघारीच्या चर्चा सुरू आहेत. आधी नाशिकमधील राजकीय घडामोडी पूर्ण होऊ द्या, त्यानंतरच आम्ही आमचा विचार करू. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी अधिकृत पाठिंबा दिला असला, तरी मी थेट शिवसेना पक्षश्रेष्ठी आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे. तोपर्यंत माझी उमेदवारी कायम राहील.”
‘अंदर की बात है, भाजप के नगरसेवक हमारे साथ है!’
एकीकडे वरिष्ठ पातळीवर मनधरणीचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे रेश्मा काळे यांनी जळगाव जिल्ह्यात जोरदार प्रचार सुरू केला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख सरिता माळी यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्या त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळताना दिसत आहेत.
प्रचारादरम्यान माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जिल्हाप्रमुख सरिता माळी यांनी एक मोठा बॉम्ब टाकला. “अंदर की बात है, भाजप के नगरसेवक हमारे साथ है!” असा थेट दावा करत त्यांनी भाजपचे अनेक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. या दाव्यामुळे भाजप आणि महायुतीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महिलांना डावलल्याने नाराजी; निवडणूक रंजक होणार
दरम्यान निवडणुकीत महिलांना योग्य संधी न मिळाल्यामुळे रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरीचा झेंडा फडकवला आहे. मतदारसंघामध्ये सध्या त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा रेश्मा काळे यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. आम्हाला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने सध्या तरी निवडणूक लढवण्यावर आम्ही ठाम आहोत, असे रेश्मा काळे यांनी म्हटले. यामुळे भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर हा बंडखोरीचा तिढा सुटणार की महायुतीला जळगावात फटका बसणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
