अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
Chalisgaon BJP Leader FIR: मद्यधुंद अवस्थेत कार चालवत महिलांना उडवल्याचा आरोप असलेल्या भाजप नेत्याविरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड गावाजवळ घडला होता भीषण अपघात घडला होता. अपघातात एका महिलेचा मृत्यू, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.

चाळीसगाव-मालेगाव रोडवर बिलाखेड गावाजवळ मद्यधुंद अवस्थेत कार चालवून चार महिलांना उडविणाऱ्या भाजपाच्या सरचिटणीस जितेंद्र रविंद्र पाटील यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघातात बिलाखेड येथील सुशीलाबाई गुलचंद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर संगीता पोपट कोळी, सुनीता संजय वंजारी आणि विठाबाई युवराज हाडपे या तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने जात असताना हनुमान मंदिराजवळ पादचाऱ्यांना कारने धडक दिल्याची घटना घडली होती. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. मात्र सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्याने या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा होती. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर मृत महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून जितेंद्र पाटील यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहे.
रस्ता ओलंडत असताना अपघात
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजाता बिलाखेडजवळ तीन महिला रस्ता ओलांडत होत्या. चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने त्यांना उडवले. यामध्ये सुशीलाबाई वंजारी, रामवाडी यांचा जागीचा मृत्यू झाला. तर सुनीता संजय वंजारी, संगीता पोपट कोळी या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतक भयावह होता की, वंजारी यांना ठोकरताच त्या कारची समोरील काच फोडून चालकाच्या बाजूच्या आतील भागात पडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांनी जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात हलवले आणि घटनास्थळी पोलिसांना पाचारण केले. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमितकुमार मनेळ हे तातडीने घटनास्थळी पोहचले. चालकावर कठोर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी रात्रीच रास्ता रोको आंदोलन केले. बुधवारी दुपारी सुद्धा रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर आणि तीव्र संतापानंतर भाजप नेत्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.