AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 वर्षांची सिद्धी, शेजारच्या घरातून सागरचा आवाज आला, तिने क्षणात धाव घेतली अन् भयंकर घटना टळली

एखादं मोठं संकट समोर दिसत असताना कधी कधी एक क्षण पुरेसा असतो, योग्य निर्णय घेण्यासाठी. चाळीसगावच्या सिद्धीने तेच केलं. त्यामुळेच आज ती जणून देवदूतच बनून आली, अशी जळगावात चर्चा आहे.

12 वर्षांची सिद्धी, शेजारच्या घरातून सागरचा आवाज आला, तिने क्षणात धाव घेतली अन् भयंकर घटना टळली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2023 | 9:38 AM
Share

अनिल केऱ्हाळे, जळगाव | तुमच्या-आमच्यासारखे सामान्य दिसणारे लोक, कधी कधी एवढी मदत करून जातात की त्यंचे उपकार आयुष्यभर फेडता येत नाही. त्यात एखाद्या भयंकर क्षणी प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीचे ऋण जीवनात सदैव स्मरणात राहतात. जळगावात सध्या अशाच एका मुलीची चर्चा आहे. समोरचं संकट पाहून तिने क्षणात घेतलेला निर्णय, दाखवलेली तत्परता यामुळे शेजारच्या मुलाचे प्राण वाचलेत. या मुलीचं नाव आहे सिद्धी. सिद्धी खरंतर १२ वर्षांचीच आहे. तिने दाखवलेल्या धाडसामुळे, तिच्या समयसूचकतेमुळे तिला आज शहरात देवदूत म्हणूनच ओळखलं जातंय. शेजारच्या सागरचे प्राण वाचवणाऱ्या सिद्धीचं कामही खरोखर मदतीला धावून आलेल्या देवदुतासारखं आहे.

काय घडलं नेमकं?

जळगावात घडलेला हा भयंकर प्रसंग सध्या चर्चेत आहे. ही घटना चाळीसगाव शहरातील आहे. येथील संजय गांधी नगरात सागर सपकाळ आणि सिद्धी गायके हे दोघे एकमेकांचे शेजारी. मंगळवारी सकाळच्या वेळी दोघेही आपापल्या घरात होते. सकाळी शाळेसाठी आवराआवर करणाऱ्या सिद्धीला अचानक शेजारून आवाज आला. तिने कान देऊन ऐकलं तर तो सागरचा होता. त्याला काहीतरी वेदना होतायत, असं तिला वाटलं अन् ती क्षणात सागरच्या घरात पोहोचली.

हिटरचा करंट, विद्युत पुरवठा बंद

सागरच्या घरात पोहोचताच सिद्धीने पाहिलं. त्या हिटरमधून सागरला करंट बसत होता. सिद्धीचं वय पाहता या क्षणी एखादी मुलगी घाबरून गेली असती. पण तिने समयसूचकता दाखवली. पुढे काय करायचं हे तिला क्षणात लक्षात आलं. तिने सागरच्या घरातील विद्युतपुरवठा बंद केला. त्यामुळे सागरला ज्या हिटरचा करंट बसत होता, ते निष्क्रिय झालं. सिद्धीने नंतर लगेच सागरच्या हातातलं हिटर काढून घेतलं आणि नंतर कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेलं. सिद्धीच्या एका कृतीमुळे आज सपकाळ कुटुंबावरचं मोठं संकट टळलं. तिच्या या शौर्याची चर्चा चाळीसगावसह जळगावातही सुरु आहे.