ज्या रेल्वेने जीव घेतला, त्यातूनच आईचा मृतदेह कसा घेऊन जाऊ? मुलाच्या आर्त हाकेने प्रशासनाला पाझर फुटला, मग केली अशी व्यवस्था

Jalgaon Pushpak Express Accident : जळगावमध्ये पुष्पक एक्सप्रेसच्या अपघातात अनेक नेपाळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातील एका कुटुंबाच्या व्यथेने अनेक गहिवरले. मुलाच्या आर्त हाकेने प्रशासन मदतीसाठी सरसावले.

ज्या रेल्वेने जीव घेतला, त्यातूनच आईचा मृतदेह कसा घेऊन जाऊ? मुलाच्या आर्त हाकेने प्रशासनाला पाझर फुटला, मग केली अशी व्यवस्था
जळगाव अपघात
| Updated on: Jan 23, 2025 | 5:28 PM

जळगावमध्ये परधाडे येथील पुष्पक एक्सप्रेसच्या अपघाताने सर्वच हळहळले. अनेक नेपाळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नेपाळ येथील मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना मृतदेह रुग्णवाहिकेने मृत्युंजय नेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव आणि गोंधळ उडाला होता. त्यातील एका कुटुंबाच्या व्यथेने अनेक गहिवरले. मुलाच्या आर्त हाकेने प्रशासन मदतीसाठी सरसावले.

प्रशासनाविरोधात व्यक्त केला संताप

जळगावचे परधाडे येथील रेल्वे अपघातामध्ये मयत व्यक्तींमध्ये नेपाळ येथील कमला भंडारी या महिलेचा समावेश आहे. कमला भंडारी यांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेने मृतदेह गावापर्यंत नेला जाईल असं सांगण्यात आलं. मात्र ऐनवेळी प्रशासन नकार दिला. त्यामुळे नातेवाईकांनी नाराजी तसेच संताप व्यक्त केला.

रेल्वेने जीव घेतला, मृतदेह त्यातून कसा नेऊ?

कमला भंडारी यांचा मृतदेह रेल्वेने घेऊन जाण्यास नातेवाईकांना प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र रेल्वेने मिळतो तेव्हा घेऊन जाण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. या रेल्वेच्या अपघातात माझ्या आईचा मृत्यू झाला त्यातून मी तिचा मृतदेह घेऊन जाणार नाही असा पवित्रा त्यांचा मुलगा तपेंद्र भंडारी यांनी घेतला.

मुलाची उद्विग्नता, मग प्रशासनाची मदत

भारतीय सरकारकडून मोठी अपेक्षा होती मात्र एक साधी रुग्णवाहिका पण ते देऊ शकत नाही का, असा आर्त टाहो तपेंद्र भंडारी याने फोडला. रुग्णवाहिका दिली तरच मृतदेह घेऊन जाणार, नाही तर नेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्याने घेतला. दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मदत केली. रुग्णवाहिका देण्यास प्रशासन तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मयत कमला भंडारी यांचा मृतदेह नेपाळमध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली.

जड अंत करणाने नातेवाईक नेपाळकडे रवाना

जळगावच्या परधाडे येथील रेल्वे अपघातातील मृतांचे मृतदेह रुग्णवाहिकेने रवाना केले गेले. तब्बल 24 तासानंतर शवविच्छेदन तसेच सर्व कायदेशीर व इतर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह त्याच्या गावाला रवाना केले गेले.थेट गावापर्यंत प्रशासनाकडून रुग्णवाहिकेची सुविधा नातेवाईकांना उपलब्ध करून देण्यात आले. दोन पोलीस कर्मचारी सोबत देण्यात आले.