शाळेची फी भरली नाही, मग शाळेने सुनावली ही शिक्षा, पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

| Updated on: Jan 13, 2023 | 8:47 PM

पालकांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळं आता शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला आहे.

शाळेची फी भरली नाही, मग शाळेने सुनावली ही शिक्षा, पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जळगाव शाळा
Follow us on

जळगाव : शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला. विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (School) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जोपर्यंत फी भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिल्या जाणार नसल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला. शाळा प्रशासनाविरोधात पालकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) तक्रार केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शिक्षण विभागाकडे (Education Officer) याबाबत अहवाल मागवला आहे.

शिक्षण विभागाकडून अहवाल मागितला

जिल्हाधिकारी म्हणाले, माझ्याकडे तक्रार आली होती. काही विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर थंडीत बसविण्यात आले. शिक्षण विभागाकडून याचा अहवाल मागितला आहे. कोणती समस्या आहे, याची शहानिशा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

फी न भरल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर

शाळेची फी भरली नसल्यामुळं आम्हाला बाहेर बसविण्यात आल्याचं आठवीच्या विद्यार्थ्यानं सांगितलं. माझ्यासह अनेक विद्यार्थी बाहेर बसलो होतो. आधी फी भरा नंतरच तुम्हाला वर्गात बसू दिलं जाईल, असं शाळा प्रशासनाचं म्हणणं असल्याचं सांगण्यात आलं.

व्हिडीओ शुटिंग करणाऱ्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस आले होते. सरांनी तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सांगितल्याचं ते म्हणाले.

अहवालानंतर योग्य निर्णय घेणार

पालकांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळं आता शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला आहे. या अहवालानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं.

खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असं समजून पालक आपल्या विद्यार्थ्यांनी तिथं टाकतात. पण,कधीकधी पैशाची जुळवाजुळव होत नाही. अशावेळी खासगी प्रशासन शुल्क वसूल करण्यासाठी प्रयत्न करतो.

सरकार आम्हाला अनुदान देत नाही. मग, शाळा कशी चालवायची असं त्याचं म्हणणं असतं. यातून पालक व शिक्षण संस्था असा संघर्ष पाहायला मिळतो. पण, या शाळा प्रशासनानं फी मिळावी, म्हणून विद्यार्थ्यांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.