मनोज जरांगे पाटील यांची प्रकाश आंबेडकर यांना कळकळीची विनंती, पाहा नेमकं काय आवाहन केलं?

"प्रकाश आंबेडकर हे समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. गरजवंत समाजासाठी प्रकाश आंबेडकर यांनी परत यावे. मनधरणी करण्याची वेळ लागू नये. चळवळ आंबेडकर यांनीच मोठी केली आहे", असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकाश आंबेडकर यांना कळकळीची विनंती, पाहा नेमकं काय आवाहन केलं?
प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांचा फोटो
| Updated on: Aug 19, 2024 | 5:45 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना कळकळीची विनंती केली आहे. “प्रकाश आंबेडकर हे समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. गरजवंत समाजासाठी प्रकाश आंबेडकर यांनी परत यावे. मनधरणी करण्याची वेळ लागू नये. चळवळ आंबेडकर यांनीच मोठी केली आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “प्रकाश आंबेडकर यांना आम्ही मानतो. त्यांच्यावरोधात मी बोलणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी चळवळ मोठी केली. परिवर्तन त्यांनीच केलं आहे. आंबेडकर यांनी न्यायाच्या बाजूने उभे राहावे. ते महामानवांचे वंशज आहेत. त्यांना मनधरणी करण्याची गरज नाही. गोरगरीब लोकांसाठी लढणाऱ्या लोक नेत्यांनी एकत्र या. माझे आवाहन आहे. जातीसाठी जेलमध्ये जाण्यास नेत्यांनी सज्ज व्हावे”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

“सर्वच गरजवंत समाजासाठी काम करायचे आहे. राज्यात अनंत प्रश्न आहेत, ते सोडवायचे आहेत. परळी आणि बीडसह राज्यातील अनेक ठिकाणचे इच्छुक लोक भेटून जात आहेत. गोरगरीब लोकांचे प्रश्न मिटवले पाहिजेत. शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. भाजपमधील अनेक लोक माझ्याकडे उमेदवारीच्या मागणीसाठी आले आहेत. आतापर्यंत 47 लोकांनी माझी भेट घेतली आहे. सत्तेतले लोक मला रात्री भेटायला येत आहेत”, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

मनोज जरांगे यांची लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया

“माझ्यावर ड्रोनच्या साहाय्याने वॉच ठेवले जात आहे”, असंदेखील मनोज जरांगे यांनी सांगितलं. “धनगर समाजाला दहा वर्षांपासून वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. “लाडकी बहीण योजनेला मी नाव ठेवत नाही. योजना कुठल्याही चांगल्याच असतात. मला योजनेचा विरोध नाही. तुमचे 1500 रुपये आम्हाला आयुष्यभर पुरणार नाहीत. आमच्या लेकरांचा संघर्ष पाहा”, असंदेखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे यांची फडणवीसांवर टीका

दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “देवेंद्र फडणवीस तुम्हीच मंत्री छगन भुजबळ यांना आमचे प्रमाणपत्र बोगस आहेत, असे बोलण्यास सांगितले. माझ्यावर SIT का नेमली? कारण काय? एवढा रोष कशामुळे आहे? पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या, त्याला तुम्ही बढती दिली. मराठ्यांना मारहाण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या जातीचे पोलीस आणले. पोलीस आमच्या बायकांच्या मुंडक्यावर पाय देत होते. फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अनेक महिला आमच्या तडीपार केल्यात”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.