OBC Reservation | लेकरं, लेकरं, इथे काय बकरं हाय, विजय वडेट्टीवारांचा सवाल
OBC Reservation | महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय गंभीर आहे. मराठा समाजच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. म्हणूनच जालन्याच्या अंबडमध्ये एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. सर्वपक्षीय नेते या सभेला उपस्थित आहेत.

जालना : “आजची सभा ही ओबीसीच्या हक्काला धक्का लावण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, अशी ऐतिहासिक सभा आहे. जर ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही लढत असू, मंचावरचे नेते लढत असतील, आम्हाला धमकावाल, तर आम्ही आमच्या पदापेक्षा समाजासाठी लढू, पद महत्वाच नाही, समाज महत्वाचा आहे. पद येतील, जातील. पण आम्हाला तुमच्यासोबत जगायचे आहे” असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ते जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी एल्गार सभेत बोलत होते. “माझा भटक्या कसा जगतोय, ते माझ्यासाठी महत्त्वाच आहे. तुम्ही म्हणताय आमच्या पिढ्यान पिढ्या जमिनी कमी झाल्या, 20 एकरच्या 5 एकर झाल्या. पण ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत. ज्याच्याकडे 2 एकर जमीन नाही, तो कुठे असेल? याचा विचार तुम्ही करणार नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
“मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाने मोठ्या भावासारख वागलं पाहिजे. भुजबळ साहेब आपण सर्व मिळून पंतप्रधानांना विनंती करायला जाऊ, एकदा जातनिहाय जनगणना करुन टाका. मग तुम्हाला कळले जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिससेदारी हे तुम्हाला कराव लागेल” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. “आपण इथे लाखोचा जनसमुदाय अजिबात उन्हा-तान्हाची पर्वा न करता आला. तुम्ही तुमच्या हक्काच्या संरक्षण करण्यासाठी आलात. तुमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावता कामा नये म्हणून तुम्ही आलात. आमच्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावून देणार नाही” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
‘राऊताच घर जाळलं, काय दोष होता त्याचा?’
“लेकराच नाव घेऊन लोकांना बनवू नका. लेकरं, लेकरं. इथे काय बकरं हाय. तुमच्या सर्वांच्या दु:खाची जाणीव झाल्यामुळे आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत” असं वडेट्टीवार म्हणाले. “राऊताच घर जाळलं, काय दोष होता त्याचा? इतका ओबीसी द्वेष तुमच्या मनात. बीडचा पालकमंत्री सातत्याने ओबीसी असतो, म्हणून राग. त्याने कोणाच घोड मारलय” असा सवाल वडेट्टीवारांनी विचारलं. “संवैधानिक आरक्षणाचा अधिकार ओबीसींचा आहे, तो टिकवण म्हणून सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. आरक्षणाला धक्का लावला, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.
