
गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलं आहे. भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र यावर अद्याप कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यातच आता याच भटक्या कुत्र्यांमुळे एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात असलेल्या सहजीवन सोसायटीत राहणारा आयेश विश्वनाथ अमीन (३०) हा तरुण बँकेत कामाला होता. गेल्या आठ वर्षांपासून भारत बँकेच्या ठाणे शाखेत तो चांगल्या पदावर कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने आयेशच्या पायाला चावा घेतला होता. प्राथमिक उपचार म्हणून त्याने रेबीजचे इंजेक्शन घेतले होते. मात्र त्यानंतर त्याच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आयेशला वाटत होते की त्याला रेबीजची लागण झाली आहे. त्याला त्याची लक्षणे आता दिसू लागली आहेत. रविवारी २२ डिसेंबरला संध्याकाळी घरात कोणीही नसताना त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने नमूद केले होते की, रेबीजमुळे मला जो त्रास भविष्यात होणार आहे, तो माझ्या वृद्ध आई-वडिलांना आणि भावाला सहन होणार नाही. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी सुसाईड नोट आयेशने लिहून ठेवली होती.
दरम्यान या घटनेनंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर पाहायला मिळत आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम एका खाजगी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. मात्र हे काम योग्य रितीने होत नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी वारंवार केली आहे. या घटनेनंतर स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कुत्रा चावल्यानंतर वेळेत आणि पूर्ण लसीकरण (Anti-Rabies Vaccine) घेतल्यास रेबीज पूर्णपणे टाळता येतो. मात्र आयेशने केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे समजते, जे अपुरे होते. अशा वेळी केवळ शारीरिक उपचारच नव्हे, तर रुग्णाचे योग्य काऊन्सलिंग करणेही गरजेचे असते. जेणेकरून रुग्णांच्या मनात भीती निर्माण होणार नाही. सध्या कोळसेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.