भाजपमध्ये प्रवेश करताच दिपेश म्हात्रेंचा ठाकरे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट, म्हणाले गेल्या तीन वर्षांपासून…

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विकास आणि लोकहितासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

भाजपमध्ये प्रवेश करताच दिपेश म्हात्रेंचा ठाकरे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट, म्हणाले गेल्या तीन वर्षांपासून...
Dipesh Mhatre 1
| Updated on: Nov 09, 2025 | 2:57 PM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दिपेश म्हात्रे यांनी आज रविवार ९ नोव्हेंबर २०२५ पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश डोंबिवली जिमखाना येथे पार पडला. यानंतर आता दिपेश म्हात्रे यांनी ठाकरे गट का सोडला याबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दिपेश म्हात्रे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला? ते करण्यामागे नेमकं काय कारण होते? ठाकरे गट का सोडला? याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. मी हा निर्णय पूर्णपणे विकास आणि लोकहितासाठी घेतला असल्याचे दिपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

लोकविकासाची काम करण्याचे आमचा हेतू

गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती. अखेर आज मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यांनी प्रभावित होऊन रविंद्र चव्हाण आणि कपिल पाटील यांच्या नेतृत्वात आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. आज माझ्यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. लोकविकासाची काम करण्याचे आमचा हेतू आहे. आता पुढच्या काळात आम्ही ते करणार आहोत, असे दिपेश म्हात्रे म्हणाले.

आता मी लोकांना न्याय देणार

यानंतर दिपेश म्हात्रे यांनी ठाकरे गट सोडण्यामागील कारण सांगितले. मी उद्धव ठाकरे किंवा कोणावर टीका करणार नाही. त्यांनी मला नेहमी पक्षांचं काम करण्याची संधी दिली आहे. गेली १३ वर्ष मी शिवसेनेत काम केलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. विकासाची कामे करायची असतील तर सत्तेच्या आणि निर्णय घेण्याच्या केबलवर नसलो, तर लोकांची कामं करता येत नाही. लोकहिताची कामं करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता मी लोकांना न्याय देणार आहे. गेली तीन वर्ष कुठलाही निधी नाही. सर्वसामान्य लोकांची कामं करण्यास त्रास होत होता. तसेच इतर पक्षांकडून गळचेपी होण्याचं काम देखील सुरू होतं. भाजपमध्ये लोकांसाठी काम करता येईल, असा विश्वास दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.

ठाकरे गटात वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही. मात्र खालचं नेतृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत, जुने आणि नवीन यांच्यातला फरक करण्याची पद्धत याला सर्वच कंटाळतात. त्यामुळे मी त्या पक्षात न राहण्याचा निर्णय घेतला. आम्हाला या ठिकाणी जनतेला न्याय देता येईल असं वाटतं म्हणून आम्ही भाजपमध्ये आलो, असेही दिपेश म्हात्रे म्हणाले.

दिपेश म्हात्रेंचा अल्पपरिचय

दीपेश म्हात्रे हे केवळ एक नगरसेवक नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचा कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे माजी महापौर होते. त्यांची आई आणि बंधू देखील नगरसेवक म्हणून कार्यरत होते. दीपेश म्हात्रे यांनी स्वतः तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा स्थायी समिती सभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्यासोबत ७ ते ८ माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. दिपेश म्हात्रे यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने एकाच वेळी ठाकरे गट, शिंदे गट (अप्रत्यक्ष) आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांना मोठा हादरा दिला आहे.