‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

| Updated on: Feb 02, 2021 | 7:46 PM

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे (MNS 320 leaders on back foot after meet Raj Thackeray).

त्या 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला
Follow us on

कल्याण (ठाणे) : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. शहरातील या दोन बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याआधी गेल्या आठवड्यात कल्यामधील मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी संयमाने कार्यकर्त्यांशी चर्चा करुन विषय हाताळल्याने मनसेला आणखी मोठा बसणारा धक्का टळलेला आहे (MNS 320 leaders on back foot after meet Raj Thackeray).

मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा मनसेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पक्षाकडून कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं आहे. यातून काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

पक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अनंता गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही माजी नगरसेवक मनसेच्या वाटेवर असून त्यांना पुन्हा पक्षातर्फे मोठी जबाबदारी देऊन निष्ठावंताना डावलण्याची शक्यता त्यांना वाटत होती. त्यामुळे 320 पदाधिकाऱ्यांनी सरसकट आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मनसे पदाधिकाऱ्यांच्या राजीनामाचे वृत्त समोर आल्यानंतर पक्षाकडून या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्यात आली. त्यानंतर राजू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना फोन करुन चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर सोमवारी ( 1 फेब्रुवारी) संध्याकाळी सर्व पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार राजू पाटील यांच्या उपस्थित वांद्रे येथील मिग क्लबमध्ये चर्चा झाली. या चर्चेत पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले आणि त्यांनी आपले राजीनामे परत घेण्याचा निर्णय घेतला.

याप्रकरणी मनसेचे कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे यांचं सर्व महाराष्ट्र सैनिकांवर सारखं प्रेम आहे. त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांकडे लक्ष आहे. त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून सर्व गैरसमज दूर केले. आता नव्या जोमाने कामाला लागू. जनतेचा विश्वास कमवू आणि केडीएमसीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकवू”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली (MNS 320 leaders on back foot after meet Raj Thackeray).

संबंधित बातमी :

कल्याणमध्ये मनसेला मोठा झटका, 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, महापालिका निवडणुकीआधी राजकारण तापलं