तर केतनचा खून झालाच नसता, सर्वात धक्कादायक माहिती समोर, सियाच्या भावाने सांगून टाकलं!
सिया गोयलने मला केतनसोबत लग्न करायचं नाही, असं तिच्या कुटुंबीयांना सांगितलं नव्हतं. सियाने तिची इच्छा आम्हाला सांगितली असती तर आम्ही तिचे लग्न चेतन चौधरी याच्यासोबत लावून दिले असते, असे तिच्या कुटुंबाचे मत आहे.

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. होणारी पत्नी सिया गोयल हिनेच त्याचा काटा काढला आपला बॉयफ्रेंड चेतनच्या मदतीने तिने केतनला लोहगडावरून ढकलून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास सुरू केला असून यात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन विग वापरायचा, त्याला डोक्यावर केस नव्हते म्हणूनच त्याचा काटा काढला, असे सियाने सांगितल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच हत्याकांड प्रकरणात सियाच्या कुटुंबीयांची चौकशी होत असून तिच्या भावानेही धक्कादायक माहिती दिली आहे. सियाचा भाऊ साहील गोयल याने दिलेल्या माहितीनंतर सियाच्या मनात नेमकं काय चालू होतं? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
साहील गोयल याने नेमकी काय माहिती दिली?
आतापर्यंतच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी डिजिटल पुराव्यांचाही तपास केला जात आहे. पोलिसांनी सिया गोयल हिचे आई-वडील तसेच भावाला चौकशीसाठी लोणावळा पोलीस ठाण्यात बोलावले. गोयल कुटुंबाची सलग दुसऱ्या दिवशी ही चौकशी करण्यात आली. शुक्रवारी साहील गोयल याची सलग दहा तास चौकशी केली गेली. याच चौकशीत साहीलने माझ्या बहिणीने सांगितलं असतं तर आम्ही केतनसोबत तिचं लग्न लावून दिलं नसतं, असं म्टलं आहे.
चेतन हा आमच्याच समाजाचा
सूत्रांच्या माहितीनुसार सिया गोयलने मला केतनसोबत लग्न करायचं नाही, असं तिच्या कुटुंबीयांना सांगितलं नव्हतं. सियाने तिची इच्छा आम्हाला सांगितली असती तर आम्ही तिचे लग्न चेतन चौधरी याच्यासोबत लावून दिले असते, असे तिच्या कुटुंबाचे मत आहे. ‘चेतन हा आमच्याच समाजाचा आहे. त्याचे कुटुंबीयदेखील व्यवसाय करतात. आर्थिक दृष्टीकोनातून तो आमच्याच तोडीचा आहे. अशा स्थितीत आम्ही सिया आणि चेतनचे नाते स्वीकारले असते,’ असे साहिलने पोलिसांना सांगितले आहे.
तर लग्न थांबवले असते
दरम्यान, सियाला केतन आवडत नाही, असे आम्हाला कधीही वाटले नाही, असेही तिच्या कुटुंबाने सांगितले आहे. सोबतच सिया या लग्नाबाबत आनंदी नाही, हे तिने मला सांगितले असते तर मी हे लग्न घडवून आणण्यासाठी प्रयत्नच केला नसता, असेही सियाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळेच आता सियाच्या मनात नेमके काय होते? तिने केतनला ठार का केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.