किसान सभेच्या आंदोलनात नवं राजकारण, सरकारच्या समितीतून डॉ. अजित नवलेंना वगळलं, देवेंद्र फडणवीस यांचा विरोध?

| Updated on: Mar 18, 2023 | 10:55 AM

किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला भव्य लाँग मार्च स्थगित करण्यात आलाय. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासनही दिलंय. मात्र यातून नवं काही राजकारण शिजतंय का, अशी शंका उपस्थित केली जातेय.

किसान सभेच्या आंदोलनात नवं राजकारण, सरकारच्या समितीतून डॉ. अजित नवलेंना वगळलं, देवेंद्र फडणवीस यांचा विरोध?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विवेक गावंडे, मुंबई | नाशिकहून (Nashik) मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या लाँग प्रकरणात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची समिती नेमली आहे. मात्र या प्ररकणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय. सरकारने नेमलेल्या समितीत किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनाच वगळण्यात आले आहे. लाखो शेतकऱ्यांना घेऊन निघालेल्या मोर्चेकऱ्यांची भूमिका परखडपणे मांडणाऱ्या डॉ. नवले यांना का वगळण्यात आले आहे, यावरून चर्चा सुरु झाली आहे. यात सरकार काही राजकारण करू पाहतंय का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच नवलेंच्या नावाला विरोध होता, असाही सूर ऐकू येतोय.

नवं राजकारण?

किसान लॉंगमार्च मधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीतून डॉ. अजित नवले यांना वगळण्यात आले आहे.
लॉंगमार्चमधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनविली जावी अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत दिनांक 17 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीत केली होती.
किसान सभेच्या वतीने कॉम्रेड जे.पी. गावीत व आ. विनोद निकोले तसेच डॉ. अजित नवले हे समितीत असावेत अशी अपेक्षा होती. मात्र कॉम्रेड गावीत यांनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली, तेव्हा समितीत डॉ. अजित नवले यांचे नाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. असे का झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता त्यांना सुसंगत उत्तर मिळाले नाही.

वन जमिनीच्या प्रश्ना बरोबरच, कांदा, दूध, सोयाबीन, कापूस, हरभरा, हिरडा पिकांचे घसरत असलेले भाव, मिल्कोमीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली लूट, कर्जमाफी, देवस्थान व गायरान जमीन, पीक विमा, पीक नुकसान भरपाई, पुनर्वसन, यासारख्या प्रश्नांवर बाजू मांडण्यासाठी डॉ. अजित नवले समितीत हवेत अशी किसान सभेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

फडणवीस यांचा विरोध?

किसान सभेच्या मागील लॉंगमार्चमधील शिष्टमंडळातही डॉ. अजित नवले यांना आणू नका, असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरला होता. त्यावेळीही संपात फूट पाडण्याची खेळी नवले यांनी उधळून लावली होती. 1 जून 2017 च्या शेतकरी संपात हेड घडलं होतं. शेतकऱ्यांचे प्रश्न यशस्वी होईपर्यंत डॉ. नवले मुद्दा लावून धरतात. त्यामुळेच फडणवीस यांना डॉ. अजित नवले या समितीत नको आहेत, अशी चर्चा सुरु आहे. मात्र मी समितीत नसलो तरीही आमदार विनोद निकोले सरकारला पुरून उरतील. शेतकऱ्यांचा मागण्या धसास लावतील, असा विश्वास डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केलाय.

आंदोलन मागे? शेतकरी परतणार?

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्यात आता वाढ करून ३०० रुपयां ऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला.त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात येण्याची शक्यता आहे. आंदोलन थांबण्याची घोषणा काही वेळातच केली जाईल. दरम्यान,  नाशिकहून मुंबईपर्यंत आलेल्या शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी सरकारतर्फे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.