मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना भडकली; किशोरी पेडणेकरांनी केली भाजपची पोलखोल
मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे सेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर तावडे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई महापालिकेच्या एका निर्णयाने महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मुंबईच्या महापौर तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च केला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना भडकली आहे. मुंबईकरांच्या पैशांची लूट चालली आहे. असे अनेक ठराव लूट करत असल्याचे म्हणत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि महापौर रितू तावडे यांच्यावर टीका केली आहे.
ठाकरे गटाच्या नगरसेवक किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. किशोर पेडणेकर म्हणाल्या, ‘सतत महापौरांवर बोलण्याचा कंटाळा आला आहे. त्यांचे प्रतापच असे आहेत. किती मांडावे आणि किती झाकावेत. माझ्याकडे स्थायी समितीचा प्रस्ताव आहे. त्यात म्हटलं की, महापौरांच्या कार्यालयाच्या सोशल मीडिया सांभाळण्यासाठी 25 लाख खर्च होणार आहे. त्याच्याआधी 10 लाख आणि त्याहून जास्त खर्च झाला. आता 25 लाखांहून अधिक खर्चाचा प्रस्ताव आहे’.
‘मी ऐकत आहे की , महापौर म्हणत आहे की, हे माझं नाही. तीन तिघाडी काम बिघाडी, असे चाललं आहे का? स्थायी समिती काय बोलते हे सभागृह नेत्यांना माहिती नाही. सभागृह नेते काय बोलतात हे महापौरांना माहीत नाही. महापौर काय बोलतात हे दोघांनाही माहिती नाही. आमच्याबरोबर संवाद नाही. नेमकं चाललं काय? करदात्यांचा पैसा सर्वत्र खर्च केला जातो. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 45 लाख वापरले जात असतील, तर प्रसिद्ध म्हणजे काय? भटजी, मुनींना भेटणे प्रसिद्धी आहे का? महापालिकेनेही ठरवलं पाहिजे. पालिका बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.
‘एकतर प्रशासन खोटं बोलत असेल. तर महापौर खरं बोलत असेल. किंवा महापौर खोटे बोलत असेल आणि प्रशासन खरं बोलत असेल. आता प्रशासनाने सांगाव. काल असंच चाललं. आता प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोण खरं बोलतंयत, कोण खोटं बोलतंय…मुंबईकरांच्या पैशांची लूट का करतंय? हे 5-75 बोगस आहे. डायरेक्ट एक कोटीला जायचं नाही. असे ठराव आणून लोकांची लूट करायची. माझ्या हातातील पेपरमध्ये उघड उघड लिहिलं आहे की, हा पेपर माझ्या घरचा नाही. हा पालिकेच्या कामकाजाचा पेपर आहे. भाजपने एक नवीन पद्धत काढली आहे. 5 लाख ते 75 लाखांपर्यंतच काम स्थायी समितीत आणून पास करायचं, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.