Chhatrapati Shau Maharaj : मनोज जरांगेंना मुंबईत जाऊ द्यावं, पण..खासदार छत्रपती शाहू महाराजांचं मत काय?
Chhatrapati Shau Maharaj : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आता दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झालेत. पण अजूनही तोडगा निघालेला नाही. शासनाने दिलेला प्रतिसाद त्यांना मान्य नाही. यावर खासदार छत्रपती शाहू महाराज बोलले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांकडे त्यांनी परवानगी मागितली होती. पण त्यांना नकार मिळाला आहे. यावर कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज बोलले आहेत. मुंबईत पोहोचत नाही, तो पर्यंत चर्चेला तयार आहे असं जरांगे पाटील बोलतायत. त्यावर खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, “निश्चित पोहोचण्याआधी त्यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न चालू राहतील. प्रयत्न थांबणार नाही.दोन्ही बाजूने प्रयत्न चालू राहतील” आंदोलन करणं हा अधिकार आहे, पण मनोज जरांगेंना परवानगी नाकारली जातेय. मागच्या त्यांच्या आंदोलनाला झालेल्या गर्दीचा दाखला दिला जातोय.
यावर शाहू महाराज म्हणाले की, “कायदा-सुव्यवस्था हा विषय निश्चित निर्माण होतो. त्या दृष्टीने शासन विचार करेल. कोर्टाने परवानगी दिली. कोर्टाच्या परवानगीने त्यांना जाऊ दिलं पाहिजे. जर कायद-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर शासनाने पुढची पावलं उचलली पाहिजेत” कोल्हापुरातील न्यू पॅलेसमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
त्यांची भाषा ही त्यांची भाषा आहे
मनोज जरांगे पाटील यांची भाषा चुकीची आहे, त्यामुळे यापुढे त्यांच्याशी शिष्टमंडळ चर्चा करणार नाही. तुम्ही त्यांना भाषेबद्दल काय सल्ला द्याल, यावर खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, “त्यांची भाषा ही त्यांची भाषा आहे. आपली भाषा जरा वेगळी आहे. दर 40-50 किलोमीटर अंतरावर सगळ्यांची भाषा बदलते. आपली भाषा त्यांना समजली पाहिजे, त्यांची भाषा आपल्याला समजली पाहिजे” जरांगे पाटील यांच्या भाषेवर शाहू महाराजांनी सौम्य भूमिकाच घेतली.
डॉल्बीवर काय म्हणाले?
डीजे, डॉल्बीच्या वापरावरही शाहू महाराज बोलले. “डॉल्बीचा सगळ्यांना त्रास होतोय. विशेषत: ज्येष्ठ मंडळींना, मुलांना त्रास होतोय. म्हणून डॉल्बीचा कमीत कमी वापर व्हावा, शून्यावर आला पाहिजे ते चांगलं होईल” केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करणार म्हणतय, त्यावर शाहू महाराजांनी “ते करु सुद्धा शकतील असं उत्तर दिलं. पण ते सगळ्याच राज्यात करणार नाहीत असं आजच्या वर्तमानपत्रात आलं आहे”