Ladakh Accident : लग्नाला अवघी दोन वर्षे, 1 वर्षाची चिमुकली; कोल्हापूरच्या प्रशांत जाधवांना लडाखमध्ये वीरमरण

| Updated on: May 28, 2022 | 12:09 AM

कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे प्रशांत जाधव या अपघातात शहीद झाले आहेत. तर साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील विसापूरचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांनाही वीरमरण आलं.

Ladakh Accident : लग्नाला अवघी दोन वर्षे, 1 वर्षाची चिमुकली; कोल्हापूरच्या प्रशांत जाधवांना लडाखमध्ये वीरमरण
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशांत जाधव यांना लडाखमध्ये वीरमरण
Image Credit source: TV9
Follow us on

कोल्हापूर : लडाखमध्ये लष्कराची (Indian Army) बस श्योक नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जवान शहीद झाले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण (Martyr) आलं. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील जवानांचा या अपघातात मृत्यू झाला. या दोन्ही जवानांचं पार्थिव उद्या बेळगावमध्ये आणलं जाईल अशी माहिती मिळतेय. कोल्हापूरच्या (Kolhapur) गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे प्रशांत जाधव या अपघातात शहीद झाले आहेत. तर साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील विसापूरचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांनाही वीरमरण आलं.

दोन वर्षांपूर्वी लग्न, एक वर्षाची चिमुकली!

प्रशांत जाधव हे 2014 मध्ये बेळगाव येथे 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. महत्वाची बाब म्हणजे प्रशांत यांच्या लग्नाला अवघी दोन वर्षे झाली. जानेवारी 2020 मध्येच त्यांचा विवाह झाला होता. तसंच त्यांची एक वर्षाची मुलगी आहे. अशा स्थितीत प्रशांत जाधव यांच्या जाण्याने जाधव कुटुंबासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

प्रशांत जाधव यांचं यांचं शिक्षण गडहिंग्लजच्या जागृती कॉलेजमधून झालं होतं. ते 29 एप्रिल रोजी सुट्टी संपवून कर्तव्यावर परतले होते. मात्र, शुक्रवारी लडाखमध्ये त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या मागे आई, वडील, 3 बहिणी, पत्नी आणि एक वर्षाची चिमुकली असा परिवार आहे.

26 जवानांना घेऊन जाणारी बस श्योक नदीत कोसळली

लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘परतापूरच्या संक्रमण शिबिरातून 26 जवानांचा एक तुकडी उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास थोईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. वाहन सुमारे 50-60 फूट खाली नदीत पडले. 26 जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 26 पैकी 7 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतर जवानांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, शहीदांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘लडाखमधील बस दुर्घटनेमुळे आम्ही दुःखी झालो आहोत. ज्यात आम्ही आमचे शूर सैनिक गमावले आहेत. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे होतील. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.