Ladki Bahin: लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 92 लाख महिला अपात्र, आता फक्त इतक्यांनाच मिळणार लाभ

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठी छाटणी करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील तब्बल 92 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 92 लाख महिला अपात्र, आता फक्त इतक्यांनाच मिळणार लाभ
लाडकी बहीण योजना
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2026 | 10:13 AM

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. योजनेची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या तब्बल 92 लाखांनी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सुमारे 2 कोटी 48 लाख होती. आता ही संख्या 1 कोटी 65 लाख 66 हजार 164 इतकी राहिली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली. पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली होती. योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने महिलांनी यासाठी अर्ज केला. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र नंतर लाभार्थ्यांची संख्या आणि पात्रतेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले.

गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. ई-केवायसी प्रक्रिया आणि विविध निकषांच्या तपासणीनंतर अनेक लाभार्थी अपात्र ठरल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी संख्येत एवढी मोठी घट झाल्याचं पहायला मिळतंय. उत्पन्नाची मर्यादा, सरकारी नोकरी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ, कुटुंबातील सदस्यांची पात्रता तसंच ई-केवायसीशी संबंधित त्रुटी अशा विविध कारणांमुळे काही लाभार्थी अपात्र ठरले असण्याची शक्यता आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंतच सरकारी मदत पोहोचावी आणि निधीचा गैरवापर होऊ नये, हा सरकारचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान 92 लाख महिलांना अपात्र ठरवल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीबाबत आणि पडताळणी प्रक्रियेबाबत राजकीय वर्तुळातही चर्चा रंगण्याची शक्यता आहे. या योजनेवर राज्याच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो.

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी?

रक्षाबंधन जवळ येत असल्याने जुलै आणि ऑगस्ट असे दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 3000 रुपये अशी रक्कम मिळणार असल्याचं समजतंय. मात्र तीन हजार रुपये एकत्र जमा होण्याबाबत अद्याप सरकारकडून काही स्पष्ट करण्यात आलं नाही. ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे पुढील हप्ता पात्र ठरलेल्या आणि ई-केवायसी पूर्ण असलेल्या महिलांच्या खात्यातच जाण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us