कसारा घाटात दरड कोसळली, रेल्वे आणि रस्ते दोन्ही मार्गाची वाहतूक रखडली

| Updated on: Jul 22, 2021 | 1:10 AM

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे.

कसारा घाटात दरड कोसळली, रेल्वे आणि रस्ते दोन्ही मार्गाची वाहतूक रखडली
कसारा घाटात दरड कोसळली
Follow us on

नाशिक : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे रस्ते महामार्गासोबत रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही जव्हार फाट्याजवळ घडली आहे. त्यामुळे नाशिकच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे रखडली आहे. या घटनेचे काही व्हिडीओ देखील आता समोर येऊ लागले आहेत.

रेल्वे आणि रस्ते दोन्ही वाहतुकीवर परिणाम

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. आतादेखील अशीच घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर जव्हार फाट्याजवळ दरड कोसळ्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नाशिकच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या घटनेचा रेल्वे वाहतुकीवरही फरक पडला आहे. नाशिकच्या दिशेला जाणारी रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच कसाराच्या अलिकडील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

संबंधित घटनेनंतर नाशिकच्या दिशेला जाणारी वाहतूक रखडली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबलच लांब रांगा दिसत आहेत. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवासी देखील हैराण झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला सारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु झालं आहे. तसेच रेल्वे प्रशासनही सतर्क झालं असून कामाला लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आता या घटनेमुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक अनेक तास प्रभावित होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या काळोख्यात भर पावसात संपूर्ण यंत्रणा कामाला लावून वाहतूक सुरळीत करणं हे प्रशासनापुळे मोठं आव्हान बनलं आहे.

मुंबईत दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू

अवघ्या दोन दिवसांपूर्वी चेंबूर-वाशीनाका येथे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांच्या घरावर दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील जवळपास 50 हजार नागरिक हे दरडीच्या छायेत वास्तव्य करत आहेत. मुंबई शहरासह उपनगरातील 24 वॉर्डपैकी 21 वॉर्डमध्ये 291 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब जीवमुठीत घेऊन डोंगराळ भागात राहत आहेत.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

संबंधित बातम्या :

Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

Mumbai Rain | मुंबईतील दरडी जीवघेण्या, 29 वर्षात 290 लोकांनी प्राण गमावल

मुंबईत 22,483 कुटुंबीय जगताहेत जीवमुठीत घेऊन, 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजनाच नाही; धक्कादायक माहिती उघड