Red Alert : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबई जाम, भिवंडीच्या बाजारपेठांमध्ये शिरलं पाणी, पालघरमध्ये तरुण गेला वाहून अन्…
Maharashtra Heavy Rain : कुठेही बाहेर जाऊ नका... महाराष्ट्रात पावसाचा 'रेड अर्लट', मुंबई संपूर्ण जाम, पालघरमध्ये तरुण गेला वाहून... काय सांगतो हवामान खात्त्याचा अंदाज, आणखी किती दिवस कोसळणार धो धो पाऊस..., जाणून कुठे कशी आहे परिस्थिती...

Maharashtra Heavy Rain : महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत होणाऱ्या पावलामुळे अनेक ठिकाणी आता जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गुडघ्यांपर्यंत पाणी भरलं आहे तर, अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल उशीराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांना कामावर पोहचण्यास उशीर होत आहे. तर जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे संध्याकाळी घरी परतणार कसं? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, हवामन विभागाने येणाऱ्या काही दिवसांमध्ये कुठे, किती आणि कसा पाऊस होणार याबद्दल अंदाज वर्तवलेला आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेल्या सिमेंट-काँक्रीटच्या ड्रेनेज चॅनेलचं देखील नुकसान झालं आहे. याचा काही भाग कोसळ्यास घाटाच्या खाली वसलेल्या पेढे गावाला असलेला धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. शिवाय, घाटाच्या संरक्षणासाठी उभारलेल्या गॅबियन भिंतीखालची मातीही सरकू लागली आहे, ज्यामुळे सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणीची मागणी केली आहे.
भिवंडीच्या बाजारपेठांमध्ये भरलं पाणी
भिंवडीत गुरुवारी मुसळधार पाऊस झाल आणि शहराचा वेग मंदावला, तीन बत्ती, निजामपूर आणि प्रमुख बाजारांमध्ये गुडघ्यांपर्यंत पाणी भरलं आहे, अनेक गटारे आणि सांडपाण्याची चेंबर्स ओसंडून वाहू लागल्याने सांडपाणी निचरा करणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र दिसून येत आहे. एवढंच नाही तर, दुकानांमध्ये पावलाचं पाणी भरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर नागरिकांना गैरसोयाचा सामना करावा लागत आहे.
अंधेरी सब-वे बंद
अंधेर येथे रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेस जोडणार महत्त्वपूर्व अंधेरी सब-वे पाण्याने भरला असून, प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. नुकताच, साकीनाका येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने संवेदनशील भागांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केलं आहे.
पालघरमध्ये वाहून गेला तरुण
सततच्या कोसळणाऱ्या पावासामुळे एक धक्कादायक घटना देखील घडली आहे. पालघर तालुक्यातील चहाडे गावातील सज्जनपाडा येथे राहणारा 28 वर्षीय चंदन किशन वार्ता याचा मासेमारी करत असताना नदीच्या प्रवाहाच्या वेगात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना त्याचा मृतदेह आढळून आला. घडलेल्या घटनेनंतर सतर्कतेचा इशारा म्हणून दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि ओढ्यांच्या जवळ न जाण्याचं आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलं आहे.
कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 3 जुलै रोजी संपूर्ण कोकण क्षेत्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड आणि पुणे यांसारख्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला आणि अमरावती यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 4 जुली रोजी ठाणे रायगड, पुणे आणि सातारा या घाट परिसरात रेड अलर्ट राहिल, तर कोकणातील अन्य भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 5 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रांसाठी ‘रेड अलर्ट’ आणि संपूर्ण कोकण विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ लागू राहील. त्यानंतर, 9 ते 16 जुलै या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे; मात्र जुलैच्या उत्तरार्धात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.