IND vs ENG: मँचेस्टरमध्ये पोहोचली टीम इंडिया, भारतीय खेळाडूंवर आली नको ती वेळ; दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वीचा Video Viral
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या रंगणार आहे. आता या सामन्यापूर्वी भारतीय संघ मँचेस्टरमध्ये पोहोचला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या टी-20 मालिकेचा थरार सुरु आहे. चेलेस्टर-ले-स्ट्रीट येथे मुसळधार पावसामुळे पहिला टी20 सामना रद्द झाला. भारतीय क्रिकेट संघ 4 जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी मँचेस्टरमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी यांच्यासह खेळाडू टीम बसमधून उतराताना दिसत आहे. आता दुसऱ्या सामन्यात तरी वैभवला संधी मिळते की नाही हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे. कारण वैभवला संधी मिळावी अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आता टीम इंडियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात भारतीय संघावर कशी वेळ आली आहे ते पाहा…
भारतीय संघ स्वतःचे सामान उचलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, वैभव सूर्यवंशी बसमधून उतरून स्वतःची जड ट्रॉली बॅग ओढतानाही दिसत आहे. एवढ्या मोठ्या स्तरावर यश मिळवूनही भारतीय खेळाडूंमधील हा साधेपणा पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, बीसीसीआयनेही या भारतीय खेळाडूचा एक विशेष व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका ही युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे.
The Indian cricket team has left Durham for Manchester for the second T20 match.🇮🇳 #ENGvIND pic.twitter.com/FxYfKtA8qv
— Vivek Kumar Mishra🇮🇳 (@vivek23mishra) July 3, 2026
क्रिकेट चाहते 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या सामन्यात संघ व्यवस्थापनाने आपल्या विश्वचषक विजेत्या वरिष्ठ अव्वल फळीवर विश्वास ठेवला होता. पहिल्या सामन्यात संजू सॅमसन आणि इशान किशन स्वस्तात बाद झाल्यानंतर आणि सलामीवीरांमधील धावबादच्या वादामुळे, शनिवारी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या सामन्यात वैभवला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान दिले जाईल अशी जोरदार चर्चा आहे.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाला असला तरी, भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाने केलेले सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम रचला, तर कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत पहिले शानदार अर्धशतक झळकावले. मँचेस्टरमध्ये हवामान स्वच्छ राहील आणि दोन्ही संघांमध्ये एक हाय-व्होल्टेज, संपूर्ण 20 षटकांचा सामना होईल, अशी चाहत्यांना आशा आहे.
भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वॉशिंग्टन सुंदर, वैभव सूर्यवंशी, प्रसिध्दी कृष्णा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
इंग्लंड संघ : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद, ल्यूक वुड, जॉर्डन कॉक्स, जेम्स कोल्स, रेहान अहमद, सोनी बेकर
