मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला चालले होते, पण चालकाचा कारवरील ताबा सुटला अन्…

| Updated on: Mar 25, 2023 | 6:42 PM

मुलीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी चाकूर शहरातील कुटुंब कर्नाटकात चालले होते. मात्र मुलीच्या सासरी पोहचण्याआधीच कुटुंबावर काळाने झडप घातली.

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला चालले होते, पण चालकाचा कारवरील ताबा सुटला अन्...
लातूरमध्ये कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
Image Credit source: TV9
Follow us on

लातूर / महेंद्र जोंधळे : काळीज पिळवटून टाकणारी एक घटना लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहराजवळ घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चाकूर शहरातील मुलीचे कर्नाटकातल्या बसवकल्याणमधील तरुणासोबत लग्न ठरले होते. या लग्नाची बोलणी करायला कुटुंबीय चालले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. भरधाव कारवरी चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना निलंगा शहराजवळ घडली आहे. कारमधील अन्य दोन जण जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला चालले होते कुटुंबीय

चाकूर शहरातील रहिवासी असलेल्या या कुटुंबातील मुलीचे लग्न ठरले आहे. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी कुटुंबातील सहा जण आपल्या कारने कर्नाटकातल्या बसवकल्याणकडे निघाले होते. यादरम्यान निलंगा शहरापासून दोन किमी अंतरावर निलंगा-औराद शहाजनी रस्त्यावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे कार भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटली.

कारमधील चौघांचा जागीच मृत्यू

या अपघातात गंभीर जखमी होऊन कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले. या घटनेमुळे चाकूर शहरावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्याआधीच कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

विरारमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत कुटुंबाचा मृत्यू

दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून जात असताना ट्रेनने धडक दिल्याने पती-पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. सदर कुटुंब सूरतहून विरारला आले आणि विरारहून वसईत आपल्या घरी जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून चालले होते. मात्र घरी पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.