किती मतांनी निवडून येणार ?; नारायण राणे यांनी देवदर्शन घेताच सांगितला आकडा

| Updated on: Apr 19, 2024 | 3:01 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणे लढत आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघण्यापूर्वी त्यांनी गावच्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला. नंतर प्रचंड रॅलीसह ते उमेदवारी अर्ज भरायला गेले.

किती मतांनी निवडून येणार ?; नारायण राणे यांनी देवदर्शन घेताच सांगितला आकडा
भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
Follow us on

अखेर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाची ही जागा भाजपच्या वाट्याला आली असून भाजपने या ठिकाणी नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. उमदेवारी मिळताच नारायण राणे यांनी आज सकाळी देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर राणे यांचा ताफा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाला. त्यापूर्वी राणे यांनी मीडियाशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्वच उमेदवारांनी आपआपल्या मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गाचं राजकारणही आता नारायण राणे यांच्या एन्ट्रीने तापणार आहे. या मतदारसंघातून राणे उमेदवारी अर्ज भरणार होते. त्यापूर्वीच त्यांनी सपत्नीक भैरी देवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. त्यानंतर राणे हे अर्ज भरण्यासाठी निघाले. यावेळी निघालेल्या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सामील झाले आहेत.

त्यांच्यामुळे संधी मिळाली

नारायण राणे यांनी अर्ज भरायला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. मला भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी आहे. त्यांच्यामुळे मला लोकसभा लढण्याची संधी मिळत आहे. मी फॉर्म भरायला निघालो आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आले आहेत. त्यांचे आभार मानतो, असं नारायण राणे म्हणाले.

राणे आणि शक्तीप्रदर्शन हे समीकरणच

अडीच ते तीन लाखाचं मतदान घेऊन मी विजयी होणार आहे. नारायण राणे आणि शक्तीप्रदर्शन हे समीकरण आहे. त्यात सांगायला काय पाहिजे ? लोकांचा प्रतिसाद आहे. दोन्ही जिल्ह्यातील लोक प्रेम करतात. दोन्ही जिल्ह्यात आमची ताकद आहे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची ताकदही मिळाली आहे. उदय सामंत आमचे मित्र आहेत. आमचे अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत. ते मला भेटायला येत होते. मी त्यांना म्हटलं मीच येतो. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो, असं राणे म्हणाले.

अशी गर्दी कधी झाली नाही

यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. शक्तीप्रदर्शन म्हणण्यापेक्षा लोकं या रॅलीत उत्स्फुर्तपणे आले आहेत. महायुतीची मोठी ताकद रत्नागिरी सिंधुदुर्गात आहे. ती आज दिसेल. वेगळी तयारी करावी लागली नाही. राणे साहेबांना मत टाकण्याची संधी आहे. अनेक वर्षानंतर कमळावर मतं टाकण्याची संधी पहिल्यांदा मिळणार आहे. रत्नागिरीत यापूर्वी कधी रॅलीला अशी गर्दी झाली नाही, असं निलेश राणे म्हणाले.