समर्थकांनी भाजपला इशारा दिल्यानंतर उदयनराजेंचे देखील इशारावजा संकेत

भाजपने आपली पहिली आणि दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या दोन्ही यादीत उदयनराजे भोसले यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे.

समर्थकांनी भाजपला इशारा दिल्यानंतर उदयनराजेंचे देखील इशारावजा संकेत
खासदार उदयनराजे भोसले
| Updated on: Mar 16, 2024 | 9:26 PM

सातारा : उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी भाजपला इशारा दिल्यानतंर उदयनराजेंनी देखील इशारावजा अनेक संकेत देणारं विधान केलंय. उदयनराजेंची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. समर्थकांनी भाजपकडे उमेदवारी जाहीर करण्याचं आवाहन केलेलं असताना उदयनराजेंनी आपण अद्याप संन्यास घेतला नसल्याचं विधान केलंय.

भाजपनं तिकीट न दिल्यास उदयनराजेंच्या समर्थकांनी काल त्यांना अपक्ष उभं करण्याचा इशारा भाजपला दिला होता. त्यानंतर आता स्वतः उदयनराजे देखील आपण राजकारणातून संन्यास घेणार नाही. असं म्हणत समर्थकांच्या मागणीला बळ दिलंय. सध्या आपल्याकडे विमान-रेल्वे आणि सिनेमाचंही तिकीट आहे. इतर तिकीटाचं माहिती नाही अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे.

याआधी निवडणूक लढण्याबाबत 19 फेब्रुवारीला उदयनराजेंनी संकेत दिले होते. तेव्हापासून कालपर्यंत उदनयराजेंनी उमेदवारीबद्दल माध्यमांशी बोलणं टाळलं. परवा भाजपनं राज्यात २० नावं जाहीर केली, मात्र त्यात उदयनराजेंचं नाव नव्हतं. त्यामुळे काल उदयनराजेंच्या समर्थकांनी तातडीनं नाव जाहीर करावं म्हणून भाजपला इशारा दिला. नंतर आज सकाळी साडे दहाच्या सुमारास माध्यमांसमोर येत उदनराजेंनी लढण्याबाबत संकेत दिले. यानंतर बाराच्या दरम्यान भाजपचे नरेंद्र पाटलांनीही भाजपनं संधी दिल्यास सातारा लोकसभा लढण्याची इच्छा वर्तवली आणि त्याच्या दोन तासानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधवांनीही साताऱ्यातून लढण्याची इच्छा बोलून दाखवली.

त्यामुळे पुढच्या यादीत जर उदयनराजे भोसले यांचं नाव घोषित झालं नाही तर ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. साताऱ्यातून जर भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवतात का याकडे ही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा 19 एप्रिलला, दुसरा 26 एप्रिल, तिसरा 7 मे, चौथा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे ला मतदान होईल

पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या विदर्भातल्या 5 लोकसभेत मतदान पार पडेल

दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी विदर्भ-मराठवाड्यातल्या ८ लोकसभेत मतदान घेतलं जाईल

तिसऱ्या टप्प्यात बारामती, रायगड, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १२ लोकसभांमध्ये मतदान होईल

चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या १२ लोकसभांमध्ये मतदान पार पडेल

पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ अशा 13 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे