
युद्धाच्या झळांमुळे एलपीजीचा मोठा तुटवडा जाणवत असून त्याचा फटाक सर्वसामान्य लोकांना बसला आहे. इंधन टंचाईमुळे एकीकडे लोकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत, तर अनेक हॉटेल्स, व्यवसाय बंद झाले. तर दुसरीकडे ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्याचा फटका राज्यातील रिक्षाचालकांनाही बसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गॅसची टंचाई असून एलपीजी पंपावर गॅस नसल्याने रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. अनेक ठिकाणी एलपीजी गॅस पंप बंद असून गॅस भरला नसल्याने रिक्षा रस्त्यांवर धावत नाहीत, परिणामी रिक्षा चालकांच्या रोजच्या कमाईवर परिणाम झाला असून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. राज्यात थोड्याफार फरकाने अनेक ठिकाणी हेच चित्र दिसत आहे.
सोलापुरातील रिक्षाचालकांना एलपीजी गॅस तुटवड्याचा फटका
सोलापुरातील रिक्षाचालकांना एलपीजी गॅस तुटवड्याचा फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एलपीजी पंपावर गॅस नसल्याने रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गॅसवर रिक्षा चालत असल्याने, आता रिक्षा बंद ठेवण्याची नामुष्की चालकांवर आली आहे. पुढील एक तारखेपर्यंत एलपीजी गॅस मिळणार नाही असे पंपचालकाने सांगितले. त्यामुळे या वयात आम्ही घर कसे चालवायचे हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आहे, असा एका रिक्षाचालकाने सांगितलं. घरात सहा लोकं आहेत, मुलगा कुरियरचे काम करतो, त्यामुळे आमचं हातावर पोट आहे, सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अशी विनंती एका रिक्षाचालकाने केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न ऐरणीवर
छत्रपती संभाजीनगरमध्येही ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न ऐरणीवर आहे. शहरातील क्रांती चौक परिसरात सुरू असलेल्या ऑटो एलपीजी गॅस समोर ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर जवळपास एक किलोमीटरच्या दुहेरी रांगा लागल्या. एकीकडे ऑटो एलपीजी गॅसच्या दरात 35 रुपये दरवाढ झाली असली तरी दुसरीकडे गॅस मिळत नसल्याने ऑटो चालक अडचणीत सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचे 12 पैकी 11 पंप बंद असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ एकच ऑटो एलपीजी गॅस सुरू असल्याने मोठी गर्दी झाली आहे.
पेट्रोल पंपावर पेट्रोल साठी वाहन चालकांची मोठी गर्दी
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी वाहन चालकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आलं. अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठया रांगा लागल्या. तिवसा तालुक्यातील कुऱ्हा रोडवरील शेंदुर्जना बाजार येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल साठी वाहनांची गर्दी झाली होती.
आठवडाभरापासून जळगाव शहरातील पाचही एलपीजी गॅस पंप बंद
दरम्यान जळगावमध्येही अशीच परिस्थिती आहे. गॅस पुरवठा न झाल्याने आठवडाभरापासून जळगाव शहरातील पाचही एलपीजी गॅस पंप बंद आहेत. कंपन्यांकडून गॅस पुरवठा होत नसल्याने गॅस पंप चालकांवर पंप बंद ठेवण्याची वेळ आली. जळगावातील इच्छा देवी परिसर , ट्रान्सपोर्ट नगर जळगाव तोलकाटा अशा तीनही ठिकाणांवर असलेले एकूण पाचही एलपीजी गॅस पंप बंद आहेत. पाचही एलपीजी गॅस पंपवरील गॅस संपल्यामुळे रिक्षाचालक देखील त्यांची वाहनं पंपावरच उभ्या सोडून निघून गेल्याच्या चित्र पहायला मिळत आहे.
वेळेवर गॅस मिळत नसल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली असून पंप चालकांना मोठं आर्थिक नुकसान करावं लागत आहे. पाचही गॅस पंपांवरील गॅस संपल्यामुळे रिक्षा चालकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, रस्त्यावरच पंपाजवळच रिक्षा उभ्या करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे सामान्य नागरिक मात्र हैराण झाले आहेत.