
मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार आता ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे.
एवढंच नाही तर जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल अशी घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बँकिंग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेऊ. समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन योजना करण्यात येणार आहेत. समितीच्या शिफारशी आणि निकषानुसार कर्जमुक्त करण्यासाठी दीर्घकालीन योजना केल्या जातील, अशी घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
गेल्य़ा काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापला होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी नागपुरात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन देखील केलं होतं. त्यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा शब्द देण्यात आला होता. अखेर आता याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, त्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तसेच जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल अशी घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी इतर घोषणा
आगामी दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासोबतच महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत, यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.