
Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम सरकारने केली कमी आहे. शेतकऱ्यांना आता 15 टक्क्यांऐवजी 9 टक्क्यानेच व्याजदराचा मोबदला मिळणार आहे.
राज्य सरकारच्या याआधीच्या निर्णयानुसार सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन केले असेल तर त्या संबंधित शेतकऱ्याला पंधरा टक्के व्याजदराने पैसे मिळायचे. मात्र आता सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नुकत्या घेतलेल्या निर्णयानुसार हाच व्याजदर पंधरा टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर करण्यात आला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता 9 टक्के व्याजदरानेच मोबदला मिळणार आहे. त्यामुळे आता सरकारचा मोठा खर्च वाचणार आहे. मात्र भूसंपदान केलेल्या शेतकऱ्यांना मात्र या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
एकूण निर्णय: 7
चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर केली जाणार आहेत.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आली आहे.
नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा. नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसूलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम-30(3), 72 व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणार्या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.