मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिवसेनेत खळबळ, बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू?

शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळण्याची शक्यता आहे. वाचाळवीर आणि खराब रिपोर्ट कार्ड असणाऱ्या मंत्र्यांवर कोणती टांगती तलवार आहे, पाहा सविस्तर वृत्त.

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिवसेनेत खळबळ, बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू?
eknath shinde
| Updated on: May 20, 2026 | 12:58 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता महायुती सरकारमध्ये सध्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील विशेषतः शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आगामी निवडणुका आणि सरकारची प्रतिम सुधारण्याच्या उद्देशाने यंदाचा मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत कठोर निकषांवर केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाची डोकेदुखी ठरणाऱ्या अनेक मंत्र्यांना थेट डच्चू दिला जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वाचाळवीर मंत्र्‍यांना डच्चू मिळणार

यंदा मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये केवळ राजकीय गणिते न पाहता थेट कामगिरीवर भर दिला जाणार आहे. यानुसार वाचाळवीर मंत्र्‍यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. माध्यमांसमोर विनाकारण वादग्रस्त विधाने करून पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांची यादी हायकमांडने तयार केली आहे. अशा वाचाळवीर नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या मंत्र्‍यांना डच्चू दिला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

त्यासोबत सध्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड बनवले जात असून गेल्या काही काळातील कामगिरीचा आलेख तपासला जात आहे. ज्या मंत्र्यांच्या खात्याची कामगिरी संथ राहिली, ज्यांनी फाईल्सचा निपटारा वेगाने केला नाही किंवा ज्यांच्या मतदारसंघात पक्षाची ताकद घटली आहे, अशा नॉन-परफॉर्मिंग मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असे बोललं जात आहे. या ऐवजी बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या नव्या चेहऱ्यांना, पक्षासाठी निष्ठापूर्वक काम करणाऱ्या तरुण आणि अभ्यासू आमदारांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ नेतृत्वाकडूनही फेरबदलला ग्रीन सिग्नल

याआधीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार मंत्र्‍यांना कामगिरीबद्दल, तसेच मीडियासमोर बोलताना भान राखण्याबद्दल वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र तसेच काहींना कामगिरी सुधारण्याचा थेट इशारा देण्यात आला होता. मात्र आता या मंत्र्‍यांना मंत्रिमंडळातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यातील काही मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी आणि जनतेने तक्रारी केल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे अशा मंत्र्यांची नकारात्मक प्रगतीपुस्तके (Report Cards) सोपवण्यात आली आहे. या फेरबदलाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती मिळत आहे.

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

दरम्यान एकीकडे काही मंत्र्यांची खुर्ची धोक्यात आली असताना, दुसरीकडे मंत्रिपदासाठी डोळे लावून बसलेल्या आमदारांनी मुंबई ते दिल्ली अशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपले प्रगतीपुस्तक कसे उत्तम आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस थांबणार की नवीन नाराजीनाट्य सुरू होणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Follow Us