Devendra Fadnavis : अजित पवारांच्या मुलाला 1800 कोटीची जमीन 300 कोटीला, या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाविषयी प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं?.

Devendra Fadnavis : अजित पवारांच्या मुलाला 1800 कोटीची जमीन 300 कोटीला, या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis -Parth Pawar
| Updated on: Nov 06, 2025 | 12:19 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. 1800 कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. मुद्रांक शुल्क म्हणून फक्त 500 रुपये दिले असा आरोप उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ” या प्रकरणासंदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्डस असतील या संदर्भातील सगळी माहिती मी मागवली आहे. या संदर्भात चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत. सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे, त्या आधारावर जे काय तुम्हाला सांगायच ते मी सांगणार आहे. अजून संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. प्राथमिक दृष्ट्‍या जे मुद्दे समोर येतायत ते गंभीर आहेत. या प्रकरणी माहिती घेऊनच बोलणार आहे. आज सगळी माहिती माझ्याकडे येईल. त्यानंतर शासनाची पुढची दिशा काय असेल? काय कारवाई करणार ते सांगू” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भ्रष्टाचाराचे आरोप करुन सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे का? त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “या संदर्भात उपमुख्यमंत्री अशा कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालतील असं मला अजिबात वाटत नाही. या संदर्भात सरकारच एकमत आहे, कुठलीही अनियमितता झाली असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. अनियमितता झाली आहे की, नाही हे पडताळून पाहिलं जाईल. अनियमितता आढळली तर कठोर कारवाई होईल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘लोकांना पकडून, पकडून आणलं जातय’

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना शेतकरी जेव्हा संकटात होता, तेव्हा ते कार्पेटवरुन खाली उतरले नव्हते” “किमान सततच्या पराभवानंतर त्यांच्या लक्षात आलय की, लोकांमध्ये जावं लागतं. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. कारण त्यांना माहितीय की, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे आलेले आहेत. लोकांना पकडून, पकडून आणलं जातय. सरकारचं पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पोहोचतय. आरबीआयच्या नियमानुसार दररोज 600 कोटी रुपये द्यावे लागतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.