Devendra Fadnavis : सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू कसा झाला? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली महत्त्वाची माहिती

Devendra Fadnavis : परभणीत काही दिवसांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानच्या प्रतिकात्मक प्रतीची तोडफोड झाली होती. त्यावरुन मोठा हिंसाचार झाला. सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा न्यायालयीन कठोडीत मृत्यू झाला. पोलिसांवर मारहाणीचा आरोप होतोय. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्त्वाची माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis : सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू कसा झाला? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली महत्त्वाची माहिती
somnath suryawanshi-devendra fadnavis
| Updated on: Dec 20, 2024 | 1:33 PM

परभणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधाची जी प्रतिकात्मक प्रत आहे, त्या प्रतीची तोडफोड झाल्यानंतर परभणीत हिंसाचार झाला. सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्या संदर्भात आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन कोठडीत नेमकं काय झालं? कशामुळे मृत्यू झाला? तो सगळा घटनाक्रम सांगितला. “सोमनाथ व्यकंट सूर्यवंशी काद्याच शिक्षण घेत होते. मूळचे लातूर जिल्ह्यातले ते आहेत. परभणीत शिक्षण घेत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की, ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती. जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसली, त्यांना अटक करण्यात आली, त्यात सूर्यवंशी सुद्धा होते” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली. त्यानंतर दोनवेळा त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. मॅजिस्ट्रेटने लिहिलेल्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. दोनवेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारलं की, पोलिसांनी थर्ड डिग्री वापरली का? पोलिसांनी मारहाण केली का? त्यावर त्यांनी मारहाण झालेली नाही असं उत्तर दिलं” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधानसभेत सांगितलं. “सोमनाथ सूर्यवंशी पूर्णवेळ पोलीस कोठडीत असतानाच व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे. त्यात काही एडिट केलेलं नाही. फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण झालेली दिसत नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

‘जुन्या जखमांचा सुद्धा उल्लेख’

“सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्टच पहिलं पान वाचलं. पण त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलं आहे की, त्यांना श्वासाचा दुर्धर आजार होता. ब्रेथलेसनेस आहे. जुन्या जखमांचा सुद्धा उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून एमसीआरमध्ये गेले, तेव्हा जेलमध्ये असताना सकाळच्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकैद्याने तक्रार केली. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे त्यांना मृत घोषित केलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकार सूर्यवंशी कुटुंबाला किती लाखाची आर्थिक मदत देणार?

“या संपूर्ण प्रकरणात अनेक शंका तयार झाल्या आहेत. सोमनाथ सूर्यवंशी हे आरोपी असले, तरी गरीब वडार मागासवर्गीय समाजातून येतात. पैशाने कोणाचा जीव परत येणार नाही. त्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 10 लाखाची मदत देण्यात येईल. या प्रकरणात ज्या काही शंका उपस्थित झाल्या आहेत, त्याचं निरसन झालं पाहिजे म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी होईल” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.