कोकणातील एका गावाचा नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, कारण वाचून तुम्हीही म्हणाल ही मागणी योग्यच!

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील तळवडे गावाने अनोखी मागणी केली आहे. गावात ५G सोडाच, पण मूलभूत मोबाईल नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

कोकणातील एका गावाचा नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, कारण वाचून तुम्हीही म्हणाल ही मागणी योग्यच!
ratnagiri
| Updated on: Nov 21, 2025 | 5:25 PM

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांसमोर एक अनोखी मागणी ठेवली आहे. सध्या ही मागणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या मागणीसाठी गावात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

त्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील शेवटच्या टोकावर असलेल्या तळवडे या गावाने नेटवर्कच्या मूलभूत सुविधेसाठी थेट मतदानाचा संबंध जोडला आहे. यावेळी गावात सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे. गावात फुकट फिरू नका, नेट द्या… मत घ्या!, नेट दिलात तरच वोट…, अशा आशयाचे अनेक बॅनर सध्या गावात झळकत आहेत. आज 5G च्या जमान्यातही तळवडे गाव मोबाईल नेटवर्कपासून पूर्णपणे वंचित आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोखी शक्कल लढवली आहे.

यावेळी नो नेटवर्क, नो एंट्री अशा आशयाचा हा इशारा देऊन तळवडेकरांनी राजकीय नेत्यांना सडेतोड संदेश दिला. जोपर्यंत गावात नेटवर्क येत नाही, तोपर्यंत केवळ आश्वासनांवर मत मिळणार नाही, असे थेट इशारा तळवडे ग्रामस्थांनी दिला आहे.

मागणीचे कारण काय?

या गावात नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबले आहे. अंगणवाडी शिक्षिका आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना ऑनलाइन कामे पूर्ण करण्यासाठी तीन ते चार किलोमीटर दूर रेंज शोधावी लागते. तसेच गावातील लोकांचा आरोग्य, आपत्कालीन आणि सामाजिक संपर्क तुटला आहे. मुंबई आणि पुण्यातील नातेवाईकांशी बोलण्यासाठी तसेच गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास माहिती देण्यासाठीही नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून ही मागणी केली जात आहे.

दरम्यान हा बॅनर गावातील तरुणांनी लावलेला असून संपूर्ण गावाने त्याला समर्थन दिले आहे. नेटवर्कअभावी ऑनलाइन नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे आवश्यकता पडल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी गावकऱ्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे आता निवडणुकांच्या धामधुमीत आता राजकीय पक्ष तळवडे गावाची ही समस्या तातडीने कशी सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.