
मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे, मतदान सुरू असतानाच आता बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप काही ठिकाणी करण्यात आला आहे, या आरोपानंतर आणि व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना निवडणूक आयोगाकडून या आरोपांवर मोठा खुलासा करण्यात आला आहे. ही शाई आहे, जी कुठल्याही प्रकारे काढता येणार नाही, ही शाई काही वेगळी नाहीये, भारतीय निवडणूक आयोग जी शाई वापरते तीच ही शाई आहे. आणि एखादा मतदार जर मतदान करायला पुन्हा आला तर अशा परिस्थितीमध्ये त्या मतदान केंद्राचा जो केंद्राध्यक्ष आहे, त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
पुढे बोलताना निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, शाई पुसली जात आहे, हा संभ्रम पसरवला जात आहे. 2011 पासून जी शाई वापरली जात आहे, त्याच शाईचा आताही वापर होत आहे. ही शाई आम्ही मार्कर पेनच्या स्वरुपात वापरत आहोत. त्यामुळे निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे. याशिवाय विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये देखील अशा तक्रारी आल्या होत्या. शाई ड्राय झाल्यानंतर ती पुसल्या जात नाही.कोरस कंपनीचा मार्कर पेन आम्ही वापरत आहोत. 2011 पासून आम्ही एकाच कंपनीचे पेन वापरत आहोत.
दरम्यान हॅण्ड वॉशचा वापर करून देखील बोटावरची शाई पुसली जाते, असाही आरोप केला जात आहे, असा प्रश्न यावेळी निवडणूक आयोगाला विचारण्यात आला, या प्रश्नाला देखील निवडणूक आयोगनं उत्तर दिलं आहे. हे आरोप चुकीचे आहेत, आमच्या कार्यलयातील देखील सर्व लोकांनी मतदान केलं आहे. त्यांची शाई टिकून आहे ती पुसल्या गेलेली नाही. दुबार मतदारांबद्दल आम्ही काळजी घेत आहोत, त्यांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना मतदान करू दिलं जात नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
शाई एकदा ड्राय झाली की निघू शकत नाही. शाई पुसली जात आहे, शाई पुसली जाणं हे अपेक्षित देखील नाही. ही मतदारांची देखील जबाबदारी आहे, मतदारांनी देखील शाई पुसू नये, त्याला ड्राय व्हायला वेळ लागतो, आणि त्यांनी त्याआधीच जर शाई पुसरली तर तो मतदारांविरोधात देखील गुन्हा दाखल होऊ शकतो, असं इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.