
राज्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अख्खं राज्य हादरून गेलं आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज विधानसभेतही शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. मात्र, ही भूमिका मांडत असताना त्यांची जीभ घसरली. तोंडातून नको तो शब्द बाहेर आला. त्यामुळे सर्वच आवाक् झाले.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. काय भीकारचोटपणा सुरू केला आहे. एकीकडे लोक आत्महत्या करतात तर दुसरीकडे 5 ट्रिलियन संदर्भात बोललं जात आहे. 14 जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात 21 हजार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील फक्त 10 हजार शेतकऱ्यांना शासनाने मदत केली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज्यपालांच्या भाषणावर खेद व्यक्त करतो
महापुरुषांच्या आदेशाचं या राज्यात कुठे पालन केलं जातंय? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जातो आणि अवघ्या 7 महिन्यात पुतळा कोसळतो. पदोपदी शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. या राज्यात सर्वांना घेऊन जायची भूमिका असली पाहिजे. पण दोन समाजात भांडणं लावून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काय झालं? मागील राज्यपालांच भाषण आणि आताच भाषण हे एकच असल्याचं पाहायला मिळतंय. आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करतोय, असं वडेट्टीवार म्हणाले.
आकडा आला समोर
दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राज्यात दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती विधानसभेच्या प्रश्नोत्तरांमध्ये आली आहे. 2009 ते 2025 या कालावधीत एकूण 2783 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. 2025 या वर्षातच सर्वाधिक 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात झाल्याचं दिसून आलं आहे. या दोन विभागात आत्महत्येची तब्बल 1987 प्रकरणे समोर आली आहेत.