‘जे झालं ते झालं,…’, सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांवर भगतसिंह कोश्याकरी यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज जाहीर झाला. कोर्टाने आज राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कृतीवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले.

जे झालं ते झालं,..., सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांवर भगतसिंह कोश्याकरी यांची पहिली प्रतिक्रिया
Chetan Patil | Updated on: May 11, 2023 | 8:22 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज जाहीर झालाय. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज निकालाचं वाचन केलं. चंद्रचूड यांनी निकाल वाचत असताना सुरुवातीलाच नबाम रेबिया प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करत असल्याची मोठी घोषणा केली. नबाव रेबिया प्रकरणाच सर्व प्रकरणाची उत्तरे नाहीत. या प्रकरणात काही प्रश्नांची उत्तरे अपूर्ण राहिलेली आहेत, असं स्पष्ट करत सरन्यायाधीशांनी संबंधित प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केलं. त्यामुळे नबाम रेबिया प्रकरणी आता पुन्हा कोर्टात युक्तिवाद होईल. विशेष म्हणजे निकाल वाचत असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कृतीवर अतिशय कडक शब्दांत ताशेरे ओढले. कोर्टाच्या या निरीक्षणानंतर आम्ही कोश्यारी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

“राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावायला नको होती. कारण राज्यपालांकडे त्यावेळी बहुमत चाचणीसाठी पुरसे कारणे नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढला असं कोणत्याही पत्रात म्हटलं नव्हतं. व्हीप हा राजकीय पक्षाचा पाळला जातो. दहाव्या सुचीत याबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय. व्हीप हा गटनेत्याचा नाही तर राजकीय पक्षाचा पाळला जातो. बहुमत चाचणी पक्षांतर हत्यार म्हणून वापरणं चुकीचं आहे”, असं स्पष्ट निरीक्षण कोर्टाने मांडलं.

“राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे आहेत. पक्षांतर्गत वादाकडे पाहणं हे राज्यपालांचं मुळात कामच नाही. राज्यपालांनी कुठल्याही राजकीय पक्षाला सपोर्ट करणं चुकीचं आहे. आमदारांच्या जीवाला धोका असणे म्हणजे सरकार अल्पमतात आहे असा अर्थ होत नाही”, असंही सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर करताना म्हटलं.

सुप्रीम कोर्टाने तत्कालीन राज्यपाल यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर त्यांची भूमिका नेमकी काय ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडण्यास नकार दिला. त्यांनी अगदी काही वाक्यात आपली भूमिका मांडली.

“जे झालं ते झालं. कोर्टाच्या पुढे बोलणार नाही. सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाच्या टिप्प्णीवर आम्ही काय टिप्पणी करणार? सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर कोणाताही राजकीय नेता टिप्पणी करु शकणार नाही. हा, चुकीचं होतं तर ते तेव्हा होतं? त्याला आपण काय करणार? जे होतं ते कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाच्या पुढे आम्ही काही बोलणार नाहीत. कोर्टाच्या पुढे काहीच बोललं जाऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

Follow Us