
राज्यातील 29 महापालिकांची मतमोजणी सुरू झाली आहे. या महापालिकांचे कल हाती आली आहेत. या पहिल्या कलांमध्ये भाजपने डबल सेंच्युरी केली आहे. त्यामुळे राज्यात भाजपच किंग असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे मनसेला मात्र अपेक्षित यश मिळालेलं नाही. मनसेपेक्षा एमएमआयला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर ठाकरे गटालाही फारसं यश येताना दिसत नाहीये. तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत.
पहिल्या कलानुसार राज्यातील 380 प्रभागातील 2869 जागांपैकी 224 जागा घेऊन भाजप आघाडीवर आहे. तर शिंदेंची शिवसेना 56 जागा घेऊन तर काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गटाला 29 आणि अजितदादा गटाला 26 जागांची आघाडी मिळाली आहे. मनसेला चार तर एमआयएमला 5 जागांची आघाडी दिसत आहे. शरद पवार गटाला दोन आणि इतरांना पाच जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. या निवडणूक कलांवरून मतदारांचा आजही भाजपवरच विश्वास असल्याचं दिसत आहे.
युती, आघाडी नसतानाही…
विशेष म्हणजे राज्यात चित्रविचित्र समीकरणे झाली होती. भाजपची शिंदे गटासोबत काही ठिकाणी युती झाली होती. बऱ्याच ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर लढत होते. अजितदादांची राष्ट्रवादीही स्वबळावर लढत होती. तर काही ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदे एकत्र आले होते. युती असली नसली तरी भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारून निर्णयाक आघाडी घेण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
फडणवीस यांचा करिश्मा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्वाधिक प्रचार केला होता. फडणवीस यांनी सर्वच महापालिकांमध्ये सभा, रॅली केली होती. तसेच असंख्य मुलाखती घेतल्या होत्या. मेळाव्यांना संबोधित केले होते. तसेच पक्षातील नेत्यांना आपआपल्या भागात कामाला लावले होते. त्याचाच फायदा भाजपला झाला आहे. फडणवीस यांची चाणक्य निती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची मेहनत याच्या बळावर भाजपला यश मिळताना दिसत आहे. तर विरोधकांना मात्र यश मिळताना दिसत नाही.