Monsoon Update: दगलबाज मान्सून… आता थेट जुलैमध्येच बरसणार? नव्या अपडेटने टेन्शन वाढलं; उष्णतेच्या लाटेचा अलर्ट

Monsoon Update: मान्सूनच्या दगलबाजीमुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि पाणीटंचाईचे संकट आले आहे. विदर्भात जुलैमध्ये पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पेरणीची चिंता सतावत आहे. हवामान खात्याने अल निनोचा प्रभाव आणि ४० अंशांवर तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Monsoon Update: दगलबाज मान्सून... आता थेट जुलैमध्येच बरसणार? नव्या अपडेटने टेन्शन वाढलं; उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
हवामान
Image Credit source: Freepik
| Updated on: Jun 17, 2026 | 11:55 AM

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील जनता पावसाची अत्यंत अतूरतेने वाट पाहत आहे. पण आज येईल, उद्या येईल असे अंदाज येऊनही पाऊस काही पडताना दिसत नाहीये. आता तर पुन्हा एकदा मान्सूनने दगलबाजी केली आहे. विदर्भासह राज्यातील काही भागात मान्सून आता थेट जुलैमध्येच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या काळात विदर्भासह राज्यात प्रचंड उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर पेरण्याच होणार नसल्याने बळीराजाला टेन्शन आलं आहे.

हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार, विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे. विदर्भात मान्सून 25 जून ते 1 जुलै दरम्यान दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची वाटचाल प्रगतीसाठी पोषक वातावरण नसल्याने मंदावली आहे. त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट येणार असून तसा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यातील पारा 40 शी पार राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. मान्सूनच्या विलंबाचा फटका पिकांच्या सायकलला बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

पाणी टंचाई वाढणार

दरम्यान, मान्सूनबाबत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, असं जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी म्हटलंय. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केलं आहे. नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 5 ते 6 टक्के कमी पाणीसाठा आहे. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत, अशी माहितीही आशिया यांनी दिली.

काटकसर करा

दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यंदा पाणी बचतीची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. धरणामध्ये ज्या मोटरी लावल्या आहेत, त्या मोटरी काढल्या पाहिजे. जिथे सिंचनाला पाणी देण्याची गरज नाही, तिथे पाण्याच्या मोटरी काढल्या पाहिजे. रोज पाणीपुरवठा करण्याऐवजी आता नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला पाहिजे. पाऊस पडला नाही तर भयावह परिस्थिती होणार आहे. नागरिकांनी पाण्याचे काटकसरीने वापर करावा, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

Follow Us